28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeव्हिडीओछगन भुजबळ भ्रष्टाचाराचे महामेरू, लोकसभेसाठी लागले उड्या मारू

छगन भुजबळ भ्रष्टाचाराचे महामेरू, लोकसभेसाठी लागले उड्या मारू

छगन भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे(Chhagan Bhujbal wants to contest Lok Sabha Elections). त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. त्यासाठी भाजपवर दबाव टाकायलाही सुरूवात केलीय. पण नाशिक मतदारंसघात सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. गोडसे हे सध्या गॅसवर आहेत. त्यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी चर्चा सुरूय. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनाही निवडणूक लढवायची आहे. राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या भुजबळांना दिल्लीचे वेध लागले आहेत. भुजबळ हे महाराष्ट्रातील एक मातब्बर नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांचा या व्हिडीओच्या माध्यमातून समाचार घेणं आवश्यक आहे.

छगन भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा आहे(Chhagan Bhujbal wants to contest Lok Sabha Elections). त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय. त्यासाठी भाजपवर दबाव टाकायलाही सुरूवात केलीय. पण नाशिक मतदारंसघात सध्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. गोडसे हे सध्या गॅसवर आहेत. त्यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी चर्चा सुरूय. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनाही निवडणूक लढवायची आहे. राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या भुजबळांना दिल्लीचे वेध लागले आहेत. भुजबळ हे महाराष्ट्रातील एक मातब्बर नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांचा या व्हिडीओच्या माध्यमातून समाचार घेणं आवश्यक आहे.
तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की, छगन भुजबळ तुरूंगात राहून आलेले आहेत. जवळपास अडिच वर्षे ते तुरूंगात राहिले. भुजबळ यांना झालेला हा तुरूंगवास कोणत्याही स्वातंत्र्ययुद्धासाठी झालेला नव्हता. त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला होता. या भ्रष्टाचाराची परिणिती म्हणून त्यांना तुरूंगात डांबले होतं. तुरूंगात डांबण्याचं हे काम तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच पार पडलं होतं. सन २०१४ मध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार गेले, अन् देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं. त्या अगोदर सहा महिन्यांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आलं होतं. त्यावेळी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा फार चांगली होती. कारस्थानी, फेकू अशी प्रतिमा व्हायला बराच अवकाश होता.
दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांचा महाभ्रष्टाचारी म्हणून नावलौकीक देशभर निर्माण झालेला होता. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि अंधेरीचा एक भूखंड यातून भुजबळांच्या भ्रष्टाचाऱ्याचा अनेक कहाण्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यांच्या वांद्रे येथील महाविद्यालयामधील भ्रष्टाचार सुद्धा विश्वस्त सुनील कर्वे यांनी चव्हाट्यावर आणला होता.
याच दरम्यान मी सकाळमध्ये नोकरी करीत होतो. सकाळ इन्व्हिस्टीगेशन टीम म्हणजेच एसआयटीचा मी त्यावेळी प्रमुख होतो. भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याची संधी त्यावेळी मला मिळाली होती. वांद्रे – कलानगर येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये एक छुपी खोली होती. त्या खोलीमध्ये भुजबळ यांच्या व्यवहाराची सगळी कागदपत्रे लपवून ठेवलेली होती. त्यावेळी मी माझ्या पाच – सहा सहकाऱ्यांसोबत साम टिव्हीचं युनिट घेवून तिथं पोचलो होतो. अन् तिथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. या खोलीत भुजबळांची कागदपत्रे असल्याचे मी त्यांना सांगितलं. त्यावर फडणवीस यांनी त्यावेळचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख प्रवीण दिक्षित यांना सांगून त्या खोलीवर धाड टाकायला लावली होती. त्यात भुजबळांनी केलेल्या भ्रष्टाचाराची आठ पोती कागदपत्रे सापडली होती.
छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची कामं करणारे व्हीआयपी या टोपण नावाचे तिघे कंत्राटदार होते. या तिघांनी ही कागदपत्रे दडवून ठेवली होती. याबाबत माझ्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ अधिकाऱ्यांना एका झटक्यात निलंबित केले होते. त्यात अनेक निष्पाप अधिकाऱ्यांचाही बळी गेला होता. या प्रकरणाचे पुढे काय झाले, त्याचा समाचार मी नंतर एका स्वतंत्र व्हिडीओमध्ये घेणार आहे.
पण या प्रकरणामुळे भुजबळ हे किती भ्रष्टाचारी व ढोंगी आहेत, हे मला ‘याची देही याची डोळा अनुभवता आले.’
मुळात भुजबळ ज्या खात्यात जातात, तिथे लगेचच भ्रष्टाचार घेवून येतात. पीडब्ल्यूडी खात्यामध्ये भरपूर भ्रष्टाचार करता येतो. अगदी खोऱ्याने पैसे ओढता येतात, ही संस्कृतीच भुजबळ यांनी घालून दिली. सरकारी इमारतींचे बांधकाम करणे. तिथे दुरूस्ती करणे अशी कारणे दाखवून यथेच्छ भ्रष्टाचार करता येतो, हे भुजबळ यांनी दाखवून दिलं. मंत्रालय, मंत्रालयातील मंत्री व अधिकाऱ्यांची दालने, मंत्र्यांचे बंगले, न्यायालये, न्यायाधिशांची निवासस्थानं, आयएएस अधिकाऱ्यांचे बंगले, घरे, राजभवन अशा ठिकाणी दुरूस्तीच्या नावावर सरकारकडून पीडब्ल्यूडी खांत अमाप निधी मिळवतं. अनेकदा कामंही केली जात नाहीत. किंवा टीचभर काम करून हातभर निधी हडपायचा अशी ही भ्रष्टाचाराची अनोखी पद्धत भुजबळ यांनी महाराष्ट्रात – पीडब्ल्यूडी खात्यात आणली. ती आजही राजरोसपणे सुरू आहे.
पीडब्ल्यूडी खात्यात येण्यापूर्वी भुजबळ हे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री होते. त्यांनी पोलिसांच्या बदल्यांमध्ये सुद्धा असंच कार्य केलं होतं. पण तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून शिक्का बसण्यास अवकाश होता.
पण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ यांना तुरूंगात घालण्याचं मोठं काम त्यावेळी केलं होतं. भाजप सरकारकडून विरोधकांना तुरूंगात डांबण्याची पद्धत त्यावेळी रूढ झालेली नव्हती. सत्तेत आल्यानंतर भाजपने पहिले पुण्याचं काम केलं. ते म्हणजे भुजबळांना तुरूंगात डांबलं. त्यामुळे भाजपच्या या कार्याचं अख्ख्या महाराष्ट्रानं तोंड भरून कौतुक केलं होतं. बरं झाल. एक माजलेला भ्रष्टाचारी तुरूंगात गेला, अशाच प्रतिक्रिया त्यावेळी सामान्य लोकांमधून व्यक्त होत होत्या.
पण काळाचा महिमा बघा. ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली छगन भुजबळ यांना तुरूंगात डांबले गेले, त्याच फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून भुजबळ मंत्री म्हणून बसतात. एवढंच नाही तर ते आता अख्ख्या भाजपला स्वतःच्या तालावर नाचवत आहेत. नाशिकची उमेदवारी जाहीर करा असा अल्टीमेटम सुद्धा भुजबळ यांनी भाजपला दिलाय.
काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचं मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यावेळी जरांगे यांच्या विरोधात भुजबळ यांनी जोरदार दंड थोपटले. ओबीसी व मराठा अशा दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल, अशी विधानं केली. यातून त्यांनी ओबीसींची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये असताना त्यांनी समता परिषदेची स्थापना केली होती. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून भुजबळ यांनी केलेले उद्योग शरद पवारांना माहित झाले होते. त्यामुळे भुजबळांवर अंकुश ठेवण्याची गरज होती. म्हणून भुजबळांची अवनती करून त्यांना पीडब्ल्यूडी हे खातं देण्यात आलं होतं. त्यावेळी पीडब्ल्यूडी हे दुय्यम दर्जाचं खातं म्हणून ओळखलं जायचं. पण मी अगोदर नमूद केल्याप्रमाणं भुजबळांनी या खात्यात भ्रष्टाचाराच्या संधी निर्माण केल्या. त्यामुळं पीडब्ल्यूडीला मलईदार खातं म्हणून ओळखलं जातं.
तर मुद्दा असा आहे की, शरद पवार यांनी दुय्यम खातं दिल्यामुळं भुजबळ नाराज झाले. पवारांवरच दबाव आणण्यासाठी त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. देशभरात ओबीसींचे मेळावे घ्यायला सुरूवात केली. भुजबळ यांनी ओबीसी चळवळ बळकट केली. त्यामुळं शरद पवारांकडं त्यांचं पुन्हा महत्व वाढलं, अन् त्यांचं मंत्रीमंडळातील वजनही वाढलं.
भुजबळ यांना ओबीसींबद्दल तिळमात्र सुद्धा आस्था नाही. ओबीसींच्या नावाखाली मंत्रीमंडळातील आपलं स्थान बळकट करणं, मुख्यमंत्री, वित्तमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळावर दबाव ठेवून आपल्या खात्याला भरगच्च निधी मिळवणं आणि त्यातून भ्रष्टाचार करणं हे भुजबळ यांचं खरे वैशिष्ट्य आहे.
मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी जी राळ उठविली होती, ती ओबीसींच्या हितासाठी नव्हती. तर ओबीसींचे नाव घेवून मंत्रीमंडळात त्यांना स्वतःचं महत्व वाढवायचं होतं. हे महत्व वाढविण्याचे काम त्यांनी अतिशय कौशल्याने पार पाडलं आहे.
ज्या देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना तुरूंगात घातलं त्या फडणवीस व त्यांच्या भाजपलाही दबावात ठेवण्यासाठी भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधाचा हत्यार म्हणून वापर केला.
थोडक्यात काय तर भुजबळ यांचं खायचं दात आणि दाखवायचं दात वेगळे आहेत. भुजबळ हे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत. आता त्यांना खासदार होवून दिल्लीत जायचे वेध लागले आहेत. त्यामागचे कारणही असंच काहीतरी असणार आहे.
भुजबळांची ही काळी बाजू मतदारांना माहित व्हायला हवी म्हणून हा व्हिडीओचा प्रपंच केला आहे. मतदारांनी त्याचा जरूर विचार करावा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी