सुरेश डुबल : टीम लय भारी
कराड : पृथ्वीराज चव्हाण यांच्या वरदहस्तामुळे आनंदराव पाटील यांना सहा वर्षांपूर्वी विधानपरिषदेची आमदारकी ( Vidhanparishad Election ) मिळाली होती. आता या आमदारकीचा कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम 10 – 15 दिवस उरले आहेत. चव्हाण यांच्याशी फारकत घेतलेल्या आनंदराव पाटील यांची अवस्था आता ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असताना जिल्ह्यात प्रती मुख्यमंत्री म्हणून वावर असलेले आनंदराव नाना हे आता पुढील वाटचाल कशी चालू ठेवणार, त्यांचे पुढील राजकारण काय असेल, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्र म्हटले की, राजकारणाचा फड. त्यातच कराड ही यशवंतराव चव्हाण यांची मातृभूमी. त्यामुळे कराडमधील राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. येथे बरेच नेते उदयाला आले. या नेत्यांनी त्यांच्या सर्वच नाही, पण मोजक्या कार्यकर्त्यांचे कल्याणही केले.
असेच कल्याण तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आनंदरावांचे ( Vidhanparishad Election ) केले होते. त्यांनी आनंदरावांना भरभरून पदे दिली. चव्हाण यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात आनंदराव पाटील यांची विधानपरिषदेसाठी ( Vidhanparishad Election ) वर्णी लागली. राज्यपाल कोट्यातून त्यांना ही संधी मिळाली होती.
कालांतराने बऱ्याच घडामोडी घडल्या. पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ संपला. काँग्रेस – राष्ट्रवादीची राज्यातील सत्ताही गेली. कराड परिसरात काँग्रेसमध्ये दोन गट पडले. आनंदराव पाटील विरूद्ध मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे या दोन गटात शीत युद्ध रंगू लागले. सुरूवातीला कमी प्रमाणात असलेले हे शीतयुद्ध नंतर जोरात धुमसू लागले.
सन 2019 ची विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली होती. त्या पार्श्वभूमीवर पाटील – शिंदे गटातील वाद विकोपाला गेले. मनोहर शिंदे गटाने आ. आनंदराव पाटील यांच्या गटाला विधानसभेच्या तोंडावरच नामोहरण केले. आनंदराव पाटील पक्षाला घातक आहेत असे मनोहर शिंदे गटाने पृथ्वीराज चव्हाणांना पटवून दिले.
आनंदराव पाटील यांच्याविषयी काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटू लागला. त्यांना पक्षातून काढण्याची मागणी जोर धरू लागली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हा निर्णय घेण्याची वेळ आलीच आणि विधानसभेच्या निवडणुकीआधीच आनंदरावनानांना पक्षातून काढण्यात आले.
त्यानंतर कराड दक्षिण विधानसभेचे भाजपचे उमेदवार व पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधक अतुल भोसले यांनी आनंदरावांकडे गळ टाकला.
मात्र नाना भारीच हुशार ! त्यांनी आमदारकी ( Vidhanparishad Election ) जाईल या भीतीने म्हणा किंवा मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे हे दाखवण्यासाठी कोणत्याही पक्षात जाणे पसंत केले नाही. मात्र मुलगा व पुतण्या या आपल्या दोन शिलेदारांना भाजपच्या गोटात पाठवले. आपण मात्र नामानिराळे राहिले.
निवडणूक झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसले यांचा पराभव केला. राज्यात काँग्रेसच्या पाठींब्याने महाविकास आघाडीची सत्ताही आली. दरम्यानच्या काळात आनंदराव नाना कुठेही राजकीय पटलावर दिसले नाहीत.
अशातच विधानपरिषद ( Vidhanparishad Election ) सदस्यत्वाचा त्यांचा कार्यकाळ येत्या 6 जून रोजी संपुष्टात येत आहे. विधान परिषदेची टर्म संपत आली तरी नानांनी राजकीय पत्ते अजूनही झाकून ठेवले आहेत. ते ना भाजपमध्ये गेले, ना अन्य दुसऱ्या कुठल्या पक्षात. त्यामुळे एकेकाळचा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता हा कसा काय शांत आहे ? याबाबत मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
येणाऱ्या काळात ते कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतील ? आपले पुढील राजकारण कसे सुरू ठेवतील ? याविषयी कराडवासियांमध्ये कुतूहल आहे. नाना हे असं नाव आहे की, त्यांनी आतापर्यंत मुरब्बी राजकारण करत विविध पदे आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. विधानसभेतच्या निवडणुकीनंतर ते शांत बसले आहेत. त्यांचे मन मात्र नक्कीच पुढील डावपेच आखण्यात मग्न असेल, असे बोलले जात आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी आणचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा
Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू https://t.co/8dWRIN62Z9@OfficeofUT @AUThackeray @rajeshtope11 @ShivSena @NCPspeaks @NCPSpeakBeed @AjitPawarSpeaks @PawarSpeaks
— Lay Bhari (@LayBhari3) May 22, 2020
हे सुद्धा वाचा
मोदी सरकारने महाराष्ट्राला डावलले; यशोमती ठाकूरांचा घणाघात!
जयंत पाटलांनी भाजपला हिनवले; ‘’सत्ता की लालच बुरी’’!!
COVID-19 treatment charge in pvt hospitals only as per rate card: TMC