टीम लय भारी
मुंबई : गेल्या २१ वर्षांमध्ये देशात ३०० हून अधिक स्वयंपूर्ण विद्यापीठे उभी राहिलेल्या विद्यापीठांत आंबेडकरी विचाराचा वारसा सांगणाऱ्यांचे एकसुद्धा विद्याापीठ नाही, अशी खंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केली. डोंगरगावकर हे ‘आंबेडकरी संग्राम’चे अध्यक्ष आहेत(Dr. Ambedkar People’s University, Demand for extablishing).
शुक्रवारी १४ जानेवारी रोजी मराठवाडा विद्याापीठ नामविस्ताराचा २८वा वर्धापनदिन राज्यात साजरा होत आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पीपल्स युनिव्हर्सिटी’ उभारण्याचा प्रकल्प हाती घ्यावा, अशी आग्रही मागणी शिक्षणतज्ज्ञ डोंगरगावकर यांनी आज केली.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना डॉ. डोंगरगावकर यांनी सदर मागणीचे पत्र पाठवले आहे.
नव्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी किमान १० कोटी रुपये इतकीच भांडवली गरज असते. त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही सक्षम असून, त्या संस्थेकडे मालकीच्या असलेल्या इमारती या विद्यापीठासाठी जमेची बाजू आहेत, असे मत डॉ. डोंगरगावकर यांनी मांडले आहे.
हे सुद्धा वाचा
सहकाराचे एक आदर्श मॉडेल राज्याला देणारे भाऊसाहेब थोरात
राजकीय भूमिका मांडल्याने मालिकेतून केले तडीपार, मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचे सर्व दावेदार हे निरनिराळ्या क्षेत्रांतील दिग्गज आहेत. त्या सर्वांनी महाड, मुंबई, पुणे, औरंगाबाद, दिल्ली यापैकी कुठेही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पीपल्स युनिव्हर्सिटी’ नावाने स्वयंपूर्ण विद्याापीठ उभारण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असा आग्रह पत्रात धरण्यात आला आहे.
गेल्या ७५ वर्षांत पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकून सरकार, प्रशासन, न्याय संस्था, शिक्षण, उद्योग या क्षेत्रांत आणि विदेशात उच्च पदांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे योगदान ही संस्थेसाठी मोठी संपदा ठरेल, असेही डॉ. डोंगरगावकर यांनी म्हटले आहे.
आपण स्वतः ही पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आहोत. पी ई सोसायटीचे स्वयंपूर्ण विद्यापीठ उभे राहणार असेल तर त्यासाठी आपल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के भाग सलग वर्षे संस्थेसाठी योगदान म्हणून देऊ, असेही त्यांनी जाहीर केले आहे. आपल्याप्रमाणे अनेक माजी विद्यार्थ्यांनीही कृतज्ञतेपोटी योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे, असेही डॉ. डोंगरगावकर यांनी नमुद केले आहे.
राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग हा पर्यटनस्थळे आणि स्मारकांवर हजारो कोटी मुक्तहस्ते खर्च करताना दिसत आहेत. तसेच अनुसूचित जाती-जमाती विशेष घटक योजनेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहतो, असे सरकारचेच अहवाल सांगतात. त्यामुळे हा अखर्चित निधी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला शैक्षणिक विकासासाठी देण्याची मागणी का करू नये?