लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप व शिवसेनेमधील सत्तासंघर्षाचा घोळ सुरू असतानाच आता आणखी महत्वाची घडामोड घडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठविण्याची भूमिका घेतली आहे. लवकरच राज्यपालांकडून भाजपला पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली.
राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु भाजपची याबाबत अद्याप कोणतीही तयारी पूर्ण झालेली नाही. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची संख्या भाजपजवळ नाही. त्यासाठी भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.
राज्यपालांचे निमंत्रण प्राप्त झाल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होईल, आणि त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
-सुधीर मुनगंटीवार
राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर विशिष्ट कालावधीत (अंदाजे आठ – दहा दिवसांत) भाजपला विधानसभेच्या सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर, 145 आमदारांचे बहुमत भाजपला सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर शिवसेना अद्यापही ठाम आहे, तर भाजप मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेमधील संघर्ष शिगेला पोचला आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर तोफ डागत आहेत.
बहुमत सिद्ध करण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप राज्यपालांचे निमंत्रण स्विकारणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.