राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल (7 नोव्हेंबर) राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मी मी यावर भाष्य करणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आज त्यांनी ट्विट करुन सत्तार यांच्या आक्षेपार्ह विधानावर सविस्तर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. या ट्विट मध्ये सुप्रिया सुळे यांनी ”अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही” असे म्हटले आहे.
काल औरंगाबाद येथे वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांच्याबाबत राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अत्यंत संतप्त झाले. सत्तार यांच्या विरोधात राज्यभरात निषेध आंदोलने करण्यात आली. तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबादेतील घरासमोर देखील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सत्तार यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी देखील करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देत करत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती.
दरम्यान आज सुप्रिया सुळे यांनी सत्तार यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा :
Sudha Murti : संभाजी भिडे आणि सुधा मूर्तींची भेट वादाच्या भोवऱ्यात
Bharat Jodo Yatra in Maharashtra: भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सहभागी
सुप्रिया सुळे य़ांनी चार ट्विट केले असून त्यामध्ये त्या म्हणाल्या, ”महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र !”
काल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यानंतर आज त्यांनी महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचे आवाहन करत काल कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी जी समंजस भूमिका दाखविली त्याबद्दल खासदार सुळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.