अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर ‘बेस्ट‘ची ४१५ क्रमांकाच्या मार्गावरील ‘सीएनजी’ बस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. एका महिन्यातील ही तिसरी दुर्घटना असून प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेमुळे ‘बेस्ट’ने बुधवारी सेवेतून ४०० बसगाड्या परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागणार आहे. अंधेरी (पूर्व) स्थानकाबाहेरील आगरकर चौकात प्रवाशांनी खच्चून भरलेली ही बस पोहोचताच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने बसने पेट घेण्याआधीच सर्व प्रवासी बसमधून उतरले होते. त्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही. (BEST’s CNG bus burn down)
‘टाटा’ कंपनीच्या ‘मेसर्स मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट लिमिटेड’कडून चालविण्यात येणाऱ्या ‘सीएनजी’ बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. या बसगाड्यांचे उत्पादक आणि चालवणारी कंपनी जोपर्यंत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची शाश्वती देत नाहीत तोपर्यंत या बसेस रस्त्यावर धावणार नाहीत, असे ‘ट्विट’ ‘बेस्ट’ प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे ‘बेस्ट’ ताफ्यातील ११ % गाड्या कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याबाबत ‘टाटा मोटर्स’कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही.
In view of recent incidents of fire in TATA CNG buses operated by M/S Mateshwari Urban Transport Ltd BEST has decided to take all these 400 buses off road till the OEM & operator take necessary corrective measures to ensure that such incidents will not happen in future. (1/2)
— BEST Bus Transport (@myBESTBus) February 22, 2023
दरम्यान, या निर्णयामुळे बसच्या सेवेवर परिणाम होणार नसल्याचे ‘बेस्ट’चे मुख्य व्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की, ” ‘बेस्ट’ प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. रेल्वे स्थानक परिसरानजीकच्या लहान बसगाड्यांची सेवा सुरूच राहाणार आहे”. अंधेरी आणि दहिसर या दरम्यान या बसेसची सेवा सुरु होती. लिंक रोड, पश्चिम द्रुतगती मार्गावरील पूर्वेकडील प्रवाशांना ‘बेस्ट’च्या या सेवेचा फायदा होत होता. रेल्वे स्थानक आणि मेट्रोला जोडणारी ‘बेस्ट’ची या गाड्या दुवा म्हणून काम करत होत्या. पण आता ‘बेस्ट’ प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवासी व्यक्त करत आहेत.
हे सुद्धा वाचा
BEST: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल-डेकर एसी बस
BEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले ‘अच्छे दिन’