ठाण्यात आल्यावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री तसेच सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अनेक बड्या मंडळींना मामलेदार मिसळ खाण्याचा मोह आवरला नाही/ आवरत नाही. प्रसिद्ध मराठी-हिंदी अभिनेत्री सीमा देव त्यापैकी एक होत्या. ठाण्यात कधी कार्यक्रमाला आल्यावर त्यांना मामलेदार मिसळ खाण्याचा मोह व्हायचा, अशा आठवणी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी ‘लय भारी’ शी बोलताना जागवल्या आहेत. ‘सीमा देव यांच्या जाण्याने मराठी रसिकांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती गेली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘जिवा सखा’ या चित्रपटाची निर्मिती सीमा आणि रमेश देव यांनी केली. सुदैवाने या चित्रपटात गाणी लिहिण्याचे भाग्य मिळाले. संगीतकार अनिल मोहिले यांनी मी लिहिलेली तसेच आशाताई भोसले यांनी गायलेले गीत सीमाताई यांच्यासमोर सादर केल्यावर, चांगली ओळ आल्यावर त्या टाळ्या वाजवून दाद देत असत. त्यांच्यातील कलावंताची दाद खूप प्रेरणा देणारी असे, असे प्रवीण दवणे यांनी सांगितले. 1994 मध्ये प्रेरणा क्लाससेसच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास सीमा देव यांना आणायचे ठरले.
ठाणे पूर्वेतील मंगल विद्यालयाच्या पटांगणात तो कार्यक्रम होता. मुलांच्या कार्यक्रमाला याल का, अशी विचारणा सीमा देव यांच्याकडे केली. मानधन काहीसे कमी असेल असे त्यांना सांगितले. त्यांनी मानधन नको असे कळवत; ठाण्यातील प्रसिद्ध मिसळ खायला द्या, असे सांगितले. त्यानुसार त्या कार्यक्रमाला आल्या. मुलांशी बोलल्या. कार्यक्रमानंतर सीमा देव व माझी आई मंगला दवणे, नि बहीण कविता दवणे यांनी ठाण्याच्या लोकप्रिय मामलेदार मिसळचा मनसोक्त आस्वाद घेतला, असेही दवणे यांनी सांगितले. सीमा देव यांच्याशी कधी फोनवर बोलले झाले की त्या ठाण्याच्या मिसळीची आठवण काढायच्या, असेही दवणे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा
मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
फोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांना जागतिक किर्तीचे दोन पुरस्कार
मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात हडपली दोन कार्यालये!
सिने अभिनेत्री असूनही सीमा देव यांना वाचनाचा छंद होता. काही वर्षापूर्वी लोकसत्तेत माझा एक स्तंभ होता. तो वाचून सीमा देव आठवड्यातून एकदा फोन करून लेखावर गप्पा मारायच्या. सीमाताई या मावशी सारख्याच होत्या. गेल्या चार-पाच महिने अंथरूणाला खिळल्या होत्या. स्मृतीचा धागा तुटला होता. नंतर त्या अनेकांना ओळखत नव्हत्या, असेही दवणे यांनी सांगितले.