मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक, भाजपचे राज्यातील सगळ्यात मोठे ‘आर्थिक आश्रयदाते’ आणि सध्या राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा हे नाव कायम वादाच्या भोवऱ्यात सापडणारे आहे. गेल्यावर्षी त्यांनी विधवांना यापुढे ‘गं. भा’ अर्थात गंगा भागीरथी म्हणा असा फतवा काढला होता. त्यावर राज्यात चौफेर टीका झाल्यावर माफी मागण्याची वेळ आली होती. अशा या लोढा यांनी मंत्रालयातील दोन कार्यालये हडप केली आहे. राज्य मंत्रीमंडळात नऊ मंत्र्यांची भर पडल्याने सुसज्ज कार्यालये मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये अजूनही रस्सीखेच असताना लोढा मात्र दोन कार्यालये जवळ बाळगून आहेत. ही दोन कार्यालये लोढा यांना ‘कोणाची सेवा’ करण्यासाठी हवीय असाही सवाल केला जात आहे.
लोढा हे खरेतर कोणत्याच कोनातून मंत्री वाटत नाही. बांधकाम व्यावसाईक या कोशातून ते बाहेर यायला तयार नाहीत. पूर्वी त्यांच्याकडे महिला व बालकल्याण असे महत्वाचे खाते होते. पण एक वर्षात या खात्यात त्यांनी प्रभाव पाडला नाही, त्यामुळे 2 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे या सरकारमध्ये सामील झाल्यावर लोढा यांची विकेट उडणार असे वातावरण होते. पण हे लोढा भाजपचे राज्यातील सगळ्यात मोठे ‘आर्थिक आश्रयदाते’ असल्याने ते दुखावू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास त्यांच्याकडचे ‘महिला व बालकल्याण’ असे महत्वाचे खाते काढून घेत, ‘कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री’ हे ‘बिनकामाचे’ खाते त्यांच्याकडे ठेवत त्यांना खुश केले. शिवाय ते मुंबई उपनगर पालकमंत्री असल्याने मुंबई महापालिकेत त्यांना एक स्वतंत्र दालन देण्यात आले आहे. या दालनाच्या माध्यमातून भाजपचे मुंबई महापालिकेत वजन वाढावे, जास्त नगरसेवक निवडून यावेत असे फडणवीस यांचे नियोजन होते, पण या दालनात बांधकाम व्यावसाईक मंडळींचा राबता जास्त असतो. एक मंत्र्याला महापालिकेत दालन दिल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने त्यावर आक्षेप घेतला होता.
हे सुद्धा वाचा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंमुळे २ लाख कोटी गुंतवणुकीचा प्रकल्प खड्ड्यात, चूक दुरूस्त करण्यासाठी अजितदादांनी आज बोलाविली ‘जम्बो’ बैठक !
फोटो जर्नालिस्ट अतुल कांबळे यांना जागतिक किर्तीचे दोन पुरस्कार
कांद्याने केला सरकारचा वांदा; निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी चिडले
वास्तविक पाहता लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयात त्यांच्या खात्यासंदर्भातील काम कमी, बांधकाम व्यावसाईक मंडळींची ऊठबस जास्त असते. त्यांच्यासाठी लोढा यांनी दोन कार्यालये हडपली का, अशी दबक्या आवाजातील चर्चा सध्या जोरात सुरू आहे. लोढा हे जरी प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असले तरी त्यांच्याबद्दल या व्यवसायात फारसे चांगले बोलले जात नाही. ते सचोटीने हा व्यवसाय करत नाहीत, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. असे असताना भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोढा यांना ‘सांभाळून’ का घेतात, अशी चर्चा भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते करत आहेत. लोढा यांना सुरक्षा रक्षकांच्या कोंडाळ्यात राहणे आवडते. पण ते जेव्हा आपल्या कार्यालयात येतात तेव्हा त्याचा त्रास सामान्य जनतेला जास्त होतो.