सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नमती भूमिका घेत एन्ड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण न करताच घाईघाईने ही परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याकारणाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. (Savitribai Phule Pune University students Protest against management) यासाठी पुणे विद्यापीठाच्या मुख्य दरवाजाजवळ सोमवारी हजारो विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर खडबडुन जागे झालेलया विद्यापीठ प्रशासनाने ही परीक्षा ३० जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अभियांत्रिकी द्वितीय वर्षाच्या दोन सत्रांतील परीक्षांमध्ये केवळ चार दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला होता. त्या चार दिवसांत पाच विषय आणि प्रत्येक विषयाचे चार धडे पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे दोन स्तरांतील परीक्षा कालावधी वाढविण्यात यावा आणि हे शक्य नसल्यास परीक्षांमधील सुट्या वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले आहे. २५ तारखेपासून परीक्षा सुरु होणार होती. मात्र, अद्यापही अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पुणे विद्यापीठाचे निबंधक प्रफुल्ल पवार यांनी विद्यार्थ्यांना दिले होते. जोपर्यंत विद्यापीठामार्फत याबाबत निर्णय घेतला जात नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थी संघटनेने दिला होता.
हे सुद्धा वाचा
शासन परवानगी, कायदेशीर सल्ला आणि निविदेला बगल देत मुंबई विद्यापीठात बेकायदेशीर चित्रीकरण!
ठाकरेंच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे गुदमरली मुंबई; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप
मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
या परीक्षेला आता एकच दिवस उरला असताना मंगळवारी दुपारी विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून ही परीक्षा ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घेण्यात येईल, अशी माहिती दिली. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापकांना याबाबत कळविण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांमधून सुमारे ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘एनएसयूआय’ विद्यार्थी संघटनेने विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला होता. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देणार की प्रत्येक वेळा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार असा प्रश्न ‘एनएसयूआय’ने प्रशासनाला विचारला आहे.
मनःस्ताप झाला त्याचे काय?
या परीक्षेला एकच दिवस उरला असताना मंगळवारी दुपारी विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक जारी करून ही परीक्षा ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पुणे विद्यापीठाला खरोखरच काळजी आहे का? या सर्व गोंधळात जो काही मनःस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागला त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता विद्यार्थी विचारू लागले आहेत.