‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘पुकार’ सारखे हिट चित्रपट बनवणाऱ्या राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट एक चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल ९ वर्षांनी पुनरागमन करत आहेत. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनचा कार्यक्रम आणि पत्रकार परिषद सुरू असताना काही जणांनी आंदोलन केलं होतं. तसेच काळे झेंडे दाखवत कार्यक्रम देखील बंद पाडला होता. त्यानंतर चित्रपट थांबवण्याच्या धमक्या येऊ लागल्याने दिग्दर्शक संतोषी यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. (Director Rajkumar Santoshi threatened, wrote a letter to the Mumbai Police)
काही अनोळखी व्यक्तींकडून चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ‘चित्रपटाचे प्रदर्शन आणि प्रमोशन थांबवा.. अन्यथा ते चांगले होणार नाही’, अशा धमक्या देण्यात आल्याचे दिग्दर्शक संतोषी यांनी सांगितले. माझी आणि माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी मला ताबडतोब अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मी तुम्हाला विनंती करतो. अशा लोकांना मोकळे सोडले आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही तर माझे मोठे नुकसान होऊ शकते, असेही दिग्दर्शक संतोषी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात संतोषी यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर अतिरिक्त सुरक्षेची विनंती केली. याबाबतची तक्रार संतोषी यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण यांच्याकडे केली असून पोलिसांना पत्रही लिहिले आहे. पत्रात राजकुमार संतोषी यांनी सांगितले की, त्यांनी २० जानेवारीला चित्रपटाच्या टीमसोबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबईतील अंधेरी परिसरात ही पत्रकार परिषद सुरू होती, असे संतोषी यांनी सांगितले. त्यानंतर एका गटाने तेथे येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे चित्रपटाच्या टीमला पत्रकार परिषद मध्येच थांबवावी लागली.
हे सुद्धा वाचा : ‘काश्मीर फाईल्स’चे प्रमोशन करणारे पंतप्रधान राहुल भट च्या हत्येवर गप्प का? : सचिन सावंत
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महेंद्र कल्याणकरांचे प्रमोशन
नेमकं काय घडलं होतं?
शुक्रवारी (२० जानेवारी) निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना त्यांना काही लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. लोकांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली होती. विरोध वाढल्यानंतर पोलिसांना बोलवावं लागलं होतं. हा चित्रपट महात्मा गांधींना कमी लेखून त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो, असा आरोप आंदोलकांनी केला होता.