28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeआरोग्य२२ रुग्णांचे बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले; शहरात लागले...

२२ रुग्णांचे बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले; शहरात लागले रुग्णालयाचे पोस्टर्स

ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्वाचा दुवा असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी १८ आणि सोमवारी ४ अशा दोन दिवसात २२ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा आणि ठामपा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून उठले आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आता ठाणे शहरात महापालिका, प्रभाग समिती, उद्यानं, ओपन जीम आणि शासकीय इमारतींच्या आवारात व बाहेरील परिसरात नागरिकांनी स्थलांतरीत सिव्हील रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स लागले आहेत.

ठाण्यातील ठाणे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणि सिव्हील रुग्णालयात ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असत. जव्हार, वाडा, मोखाडा, ते डहाणु व मुरबाड, भिवंडी, शहापूर ते कसारा, कर्जतपर्यंत गरीब, आदिवासी, शेतकरी उपचारासाठी सिव्हीलकडे धाव घेतात. सध्या सिव्हील रुग्णालय पाडून तेथे नवीन इमारतीचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थलांतरीत रुग्णालय मेंटल हॉस्पिटलच्या जागेत सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेकांना हे रुग्णालय माहित नाही तर अनेक रुग्णालय मुख्य शहरापासून दूर असल्याने जाण्याचे टाळतात. त्यामुळे तातडीच्या उपचारासाठी सिव्हील रुग्णालय सोयीचे असल्याने येथे रुग्ण वाढत आहेत. शिवाय कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ५०० खाटा असताना ६०० रुग्ण दाखल केले आहेत. तिथेही रुग्णांचा ताण वाढल्याने तसेच उपचारात हलगर्जी, बेफिकिरी झाल्याने २२ रुग्णांचे हकनाक बळी बळी गेल्याने रुग्णांच्या जनजागृतीसाठी शहरभर स्थलांतरीत सिव्हील रुग्णालयाचा पत्ता सांगणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. मात्र तरीही ग्रामीण भागातीलच नव्हे तर शहरातीलही रुग्ण ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णांच्या उपचाराची सुविधा करण्याची मागणी करताना दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा
६७५ खर्च करून १२२ वर्ष जुन्या ठाणे मेंटल हॉस्पिटलचा होणार मेकओव्हर; १५ दिवसात निविदा निघणार
पुण्यातील धाकटया, थोरल्या पवारांच्या भेटीमुळे राजकीय चर्चाचा बाजार तेजीत
वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्स पार्क प्रकल्प गेले, ‘हुंडाई’ राज्यात पाय रोवणार; 5000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित 

नव्वदच्या दशकात कळवा येथे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले होते. हे रुग्णालय ठाणे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याने ते बंद करण्याची मागणी नगरसेवकांनी वारंवार केली होती. अनियमितता, गैरसोय, उपचार करताना होणारी हलगर्जी, त्यातून रुग्ण मरण पावल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी अनेक डॉक्टर्स मंडळींना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. असे सगळे काही असताना महापालिका प्रशासन हा पांढरा हत्ती पोसत आहे. असा आरोप दक्ष नागरिकांनी वेळोवेळी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी