टीम लय भारी
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत रविवारपासून अर्थात 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत संचारबंदी (Curfew in Alandi) लागू करण्यात आली आहे. पिंपरीचे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी ही माहिती दिली. (Curfew in Alandi from tomorrow on the background of Corona)
यामुळे आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता तीर्थक्षेत्र आळंदी येथे दरवर्षी होणा-या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.
आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व कार्तिकी यात्रा येत्या 8 ते 14 डिसेंबरपर्यत होणार आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं संकट निर्माण झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंळदी शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये पोलिस प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
आळंदीत रविवारपासून कलम 141 लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आळंदी शहरात प्रवेश करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस उपायुक्त मंचार इप्पाक यांनी सांगितल की, आळंदीतील कार्तिकी वारीसंदर्भात जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्यात एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून 6 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत आळंदीसह आजुबाजुच्या परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंढरपूरच्या धर्तीवर ही शिफारस पोलिसांनी केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आळंदीसोबत परिसरातील अकरा गावांत ६ ते १५ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.४) उशिरा जारी केले. तसेच कार्तिकी वारीतील मुख्य कार्यक्रम मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून ते कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यासाठी श्री विठ्ठल, संत नामदेव महाराज, संत पुंडलिक महाराज या तीन मानाच्या दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी वीस वारक-यांसोबत आळंदीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे. या तिन्ही मानाच्या दिंड्या ८ डिसेंबरला परिवहन महामंडळाच्या गाडीने (एसटी) आळंदीत दाखल होतील.
दरम्यान, संचारबंदी काळात इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वारीदरम्यान कीर्तन, जागर, माउलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा करण्यास अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे. माउलींच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबा पायरीपूजन चालीरीतीनुसार होणार असून, या पूजेस ५० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे, तर अन्य कार्यक्रमांना केवळ २० ते ३० जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.