नेत्वा धुरी, मुंबई: राज्यातील वनविभागाअंतर्गत वनरक्षक तसेच इतर आवश्यक पदांसाठी जुलै महिन्यात स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. सहकार विभागातील गट क संवर्गातील परीक्षा 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांचे निकाल अद्यापही प्रलंबित आहेत. दोन्ही विभागातील निकाल अद्यापही जाहीर न झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याची टीका युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कुलमर्गे यांनी केली. संपूर्ण देशात कोरोनानंतर बेरोजगारीची समस्या आ पासून उभी असताना सरकारकडून स्पर्धा परीक्षांचा निकाल वेळेवर न लागल्याने तरुणांची मनस्थिती बिघडत असल्याची खंतही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या परिक्षाच्या तयारीसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिवस रात्र एक करून तयारी केली आहे. सरकारने परीक्षा चा निकाल रखडवून आमची टीका केल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.
नेमके प्रकरण काय ?
राज्यातील वनविभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जून महिन्यात वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या रिक्त पदांसाठी १० जून पासून ऑनलाईन अर्ज मागवले गेले. केवळ वनरक्षक पदासाठीच ४ लाख ५१ हजार अर्ज आले. प्रत्यक्षात वनरक्षक पदांसाठी केवळ २ हजार १३८ जागाच उपलब्ध होत्या. ३१ जुलै रोजी वनविभागाच्या विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली गेली. ही परीक्षा टीसीएस कंपनीच्यावतीने घेण्यात आली. दोन महिने होऊनही वनविभागाच्या परीक्षांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. वनरक्षक भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत कोणतीच कल्पना विद्यार्थ्यांना अद्यापही दिली गेलेली नाही, अशी माहिती युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कुलमर्गे यांनी सांगितले.
वनरक्षक ऑनलाईन परीक्षा टीसीएस मार्फत आयोजित केल्याने तर त्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. एस एस कंपनी परीक्षा झाल्यापासून चार दिवसांच्या आतच रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात वनरक्षक परीक्षेच्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून पेपर फुटीच्या तक्रारी आढळून आल्या. वनरक्षक ऑनलाईन परीक्षेचा शेवटचा पेपर ११ ऑगस्ट रोजी झाला. अद्यापही या पेपरची रिस्पॉन्स शीट मिळालेली नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
हे ही वाचा
मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच फैलावर घेतले
विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!
लोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार
सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरीक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकार अधिकारी, वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघु टंकलेखक या वर्गवारीतील ३०९ पदांसाठी १४ आणि १६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेतल्या गेल्या. या परीक्षेचे उत्तर तालिका आणि उत्तरावरील आक्षेप अर्जाची लिंक २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. सहकार आयुक्तालय उत्तर तालिका जाहीर झाली आहे. मात्र या परिक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही, अशी तक्रारही युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कुलमर्गे यांनी केली.
सद्यस्थितीत महाराष्ट्रातील साडेचार लाख हून अधिक विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर भविष्यातील योजनांबद्दलचे नियोजनही करावयाचे असते. निकाल अनपेक्षित असेल तर पुन्हा परीक्षेसाठी तयारी करायची का, इतर परीक्षांचे नियोजन याबाबतीत विद्यार्थी आतापासूनच प्रचंड संभ्रमात आहेत. त्यामुळे परीक्षांचे निकाल तसेच जिल्हा परिषदेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी विनंती युवा रोजगार परिषदेचे डॉक्टर लक्ष्मीकांत कुलमर्गे यांनी केली.