लय भारी न्यूज नेटवर्क
जामखेड : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो मुसलमान बांधव शहीद झालेत. आता देश अन संविधान वाचवण्यासाठी मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरला आहे. बहुमताच्या जोरावर भाजपाकडून संविधानविरोधी एनआरसी व सीएए कायदे लागू करून देशाच्या एकतेला सुरूंग लावण्याचे पाप केले जात आहे. देशातील मुस्लिम बांधव कलम 370, तीन तलाक व राम मंदिर प्रश्नांवर शांत राहिला याचा अर्थ एनआरसी व सीएए कायद्यासंदर्भातही शांत बसेल असे भाजपला वाटत असेल तर तो भाजपचा भ्रम आहे. मुस्लिम समाज कधीच शांत बसणार नाही. आजवर समाजाने खूप अन्याय सहन केला. परंतु ‘इस दौर में जीना है तो कोहराम मचाओ’ असे सांगत सर्व समाज घटकांसोबत खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्यासाठी मुस्लिम समाज शहीद होण्यास तयार आहे असे प्रतिपादन जमियत ए उलेमा हिंद संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शादुल्ला कासमी यांनी केले.
सीएए व एनआरसी कायद्याविरोधात जमियत ए उलेमा हिंद जामखेड शाखा व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांकडून शुक्रवारी दुपारी जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या महामोर्चाला सुरुवात झाली.मक्का मस्जिद खर्डा चौक बीड काॅर्नर या भागातून हा मोर्चा पुढे तहसिल कार्यालयालयावर जाऊन धडकला.मोर्चा तहसिल कार्यालयावर धडकल्यानंतर झालेल्या सभेत मौलाना कासमी बोलत होते.
तब्बल चार तास नागरिकांनी तहसिल कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले. मोर्चा व धरणे अंदोलन शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी स्वता:हून खबरदारी घेत पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. मोर्चात नागरिकांसह विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे तसेच मौलाना आझाद, डाॅ अब्दुल कलाम या महापुरूषांच्या प्रतिमा घेऊन संविधान बचावचा नारा दिला. त्याचबरोबर विविध घोषणांचे फलक प्रत्येकाच्या हातात होते. मोर्चेकर्यांच्या एनआरसी व मोदी सरकारविरोधी घोषणा दिल्या. ‘हम सब एक है’, ‘तानाशाही नहीं चलेगी’, एनआरसी नको शिक्षण व रोजगार पाहिजे, इन्कलाब जिंदाबाद, सह आदी घोषणांनी जामखेड शहर दणाणुन गेले होते. या मोर्च्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समस्त भीमसैनिक, भारत मूक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आदी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते.
केंद्र शासन एनआरसी,नागरीकत्व सुधारणा विधेयक आणि पीपल्स रजिस्टरच्या निमित्ताने धर्मावरून भेदभाव आणि ध्रुविकरण करत असून हे संविधान विरोधी आहे. ‘पीपल्स रजिस्टर’ हे रजिस्टर तयार करून जातीय आणि धार्मिक समुहाचे विभागवार तपशील जाहीर करण्याचा केंद्र शासनाचा डाव आहे. देशातील नागरिकांची नोंदणी मतदार यादी, रेशनकार्ड, पॅनकार्ड, जन्मनोंदणी , आधारकार्ड या माध्यमातून होते. तसेच ठराविक कालावधीनंतर देशाची जनगणना होते. त्यामुळे एनआरसीची गरज नाही अशी भूमिका सर्वच वक्त्यांनी मांडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, मौलाना खलील, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, अॅड हर्षल डोके, भारत मुक्ती मोर्चाचे नामदेव राळेभात, कुंडल राळेभात, विकी सदाफुले, मुफ्ती अफजल पठाण सह आदींनी आपली भूमिका मांडली.
या अंदोलनात माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, जमियत ए उलेमा हिंदचे जामखेड तालुकाध्यक्ष जावेद सय्यद, शहरकाझी अजहर काझी, लतिफभाई शेख, राजभैय्या सय्यद, नगरसेवक शामीर सय्यद, काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर बारूद, भाजपाचे युवा नेते अमजद पठाण, इम्रान कुरेशी, शेरखान पठाण, हभप अमृत महाराज डूचे, उमर कुरेशी, एमआएमचे तालुकाध्यक्ष जाकीर काझी, परवेज बारूद , बापुसाहेब गायकवाड, हाफिज इसहाक, मौलाना समीर अमित जाधव, अनिल सदाफुले सह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.
चार तास चाललेल्या अंदोलनानंतर तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना अंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान अंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
हे सुद्धा वाचा