सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावागावात प्रचाराच्या फैरी झडत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचारदौरे करत आहेत. आज कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे बोलताना नितेश राणे यांनी गावकऱ्यांना थेट धमकीचीच भाषा केली, जर माझ्या विचारांचा सरपंच गावात निवडून आला नाही तर तुमच्या गावाला निधी मिळणार नाही, वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राणे यांच्यावर सध्या जोरदार टीका सुरू आहे. त्यांचे विरोधक आमदार वैभव नाईक म्हणाले सत्तेचा माज आल्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत. अशा प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये असे देखील ते म्हणाले.
नांदगाव येथे प्रचारासाठी नितेश राणे आले होते. यावेळी त्यांनी थेट गावकऱ्यांना धमकीवजा भाषेतच इशारा दिला की, जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी निधीच देणार नाही, आता कोणत्या गावाला निधी द्यायचा किंवा नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करताना विचार करा, जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला तरच निधी मिळेल आणि नाही आला तर एक रुपया देखील निधी मिळणार नाही.
येत्या 18 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धुरळा सुरू आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 77५१ ग्रामपंचायतींसाठी पहिली मोठी निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपले पॅनेल निवडून आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय बदलून पुन्हा थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय शिंदे-भाजप सरकारने घेतला आहे. त्यामुळे जास्तीजास्त सरपंच आपल्या विचाराचे कसे निवडून येतील याच्या तयारीत राजकीय पक्ष आहेत. त्यासाठी जोरदार प्रचार सध्या सुरु आहे.
हे वाचा
साताऱ्यातील मंत्र्याचा गावभर बोभाटा; वाढदिवसाच्या वसूलीसाठी अधिकाऱ्यांना फतवा
अनिल देशमुखांना मंजूर केलेला जामीन काही मिनिटातच घेतला मागे
नांदगाव येथे बोलताना राणे म्हणाले की, डीपीडीसी, ग्रामविकास, 25:15 अथवा केंद्र सरकारचा निधी असो हा निधी कोणाला द्यायचा याची सूत्रे माझ्या हातात आहेत. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, 25:15 निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. जिल्हाधिकारी, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा, असे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. सत्तेचा माज आल्याने राणे अशी विधाने करत आहेत. मागे नारायण राणे यांचा देखील माज जनतेने उतरवला होता. त्यामुळे आता देखील जनता त्यांचा माज उतरवेल, असे आमदार नाईक म्हणाले.
Nitish Rane, Gram Panchayat Election, KanKavali