मुंबईसहित राज्याच्या विविध भागात महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचारात गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. सरकारचे व विशेषतः गृहखात्याचे अस्तित्व राज्यात आहे की नाही असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची त्वरित गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. सातत्याने होत असलेले महिला अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखण्याची व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार प्रा. डॉ. मनिषा कायंदे यांनी व्यक्त केले.
उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला सुरक्षिततेला प्राधान्य दिले होते. त्यांच्या काळात महिला सुरक्षित होत्या. मात्र त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेली निर्भया पथके, दामिनी पथके सध्या कुठे आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याने अत्याचाराची प्रकरणे वाढीस लागल्याचा आरोप त्यांनी केला. कोरियन तरुणीची छेड काढण्याच्या प्रकारामुळे जागतिक पातळीवर मुंबईची व महाराष्ट्रासहित देशाची नाचक्की झाली आहे, असे प्रकार रोखण्यासाठी कठोर इच्छाशक्तीची गरज डॉ. कायंदे यांनी बोलून दाखवली. राज्यातील पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. मात्र त्याचा परिणाम महिला व मुलींच्या रक्षणाबाबत होण्याची तडजोड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावले.
हे सुद्धा वाचा
RTO च्या अधिकाऱ्यांची बोगसगिरी, अनिल गोटेंनी उठवला आवाज !
बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण
राज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !
मुंबई व महाराष्ट्रात महिला व मुलींवरील अत्याचारात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बलात्कार, विनयभंग, अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन अत्याचार व खून करणे, मुलींना देह व्यापाराच्या दलदलीत ढकलणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. एकीकडे राज्य सरकार महिला पर्यटन धोरण निश्चित करत असताना मुंबई भेटीवर आलेल्या कोरियन तरुणीची सर्वांदेखत छेडछाड केली जाते, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांचा अजिबात वचक नसल्यानेच असे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा लांच्छनास्पद प्रकारांमुळे जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोन चुकीचा होण्याची भीती आहे. या सर्व प्रकाराची गृहमंत्र्यांनी तत्काळ गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. महिला अत्याचार रोखण्यास सरकारने प्राधान्य देण्याची गरज कायंदे यांनी व्यक्त केली.