मंत्रालयातील रोजच्या वाढत्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी तसेच सुरक्षेच्या अडचणी लक्षात घेऊन मंगळवारी, (26 सप्टेंबर) राज्य शासनाकडून मंत्रालय प्रवेशाबाबत नवीन नियमावली बनवण्यात आली. या नव्या नियमांनुसार, मंत्रालयाला भेट देणाऱ्यासंबंधी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. मंत्रालयात वाढत्या आत्महत्येसारखे प्रकार, अतिप्रमाणात होणारी गर्दी अशा अनेक बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने ठोस पावले उचलण्याचे ठरवले आहे. यावरूनच आता राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे पण सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश नाकारला जात आहे, अशा शब्दात पटोले यांनी घणाघात केला आहे.
बुधवारी, (27 सप्टेंबर) पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “गुजरातमध्ये एक हुकूमशाही व्यवस्था सुरु झाली तीच व्यवस्था २०१४ पासून केंद्रात आली आणि आता हीच हुकूमशाही व्यवस्था महाराष्ट्रात आली आहे. मंत्रालयात दररोज हजारो लोक आपल्या कामांसाठी येतात, स्थानिक प्रशासनाकडे हेलपाटे घालूनही त्यांचे काम होत नाही. मंत्री फक्त आश्वासने देऊन मोकळे होतात पण त्याची कार्यवाही होत नाही म्हणून शेवटी लोक मंत्रालयात येतात, काहीजण आत्महत्या करण्याचा प्रयत्नही करतात. कोणीही आत्महत्या करु नये हीच आमची भूमिका आहे पण लोक जीव देण्यापर्यंत का जातात? याचा सरकारने विचार करायला हवा.”
“शासन आपल्या दारी म्हणत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी व केवळ जाहीरातबाजी केली जात आहे प्रत्यक्षात या कार्यक्रमातून काही साध्य होत नाही म्हणून तर लोक मंत्रालयात येतात. काम होत नाही म्हणूनच आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलतात, सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मर्यादित करणे त्यासाठी जाचक अटी घालणे ही हुकूमशाहीप्रवृत्ती आहे. हे जाचक नियम लागू न करता सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश सुलभ करण्यावर सरकारने भर द्यावा. मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी मोठ्या रांगा लागतात, त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी नाहीत, जनता ही राजा आहे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे,” पटोले पुढे म्हणाले.
हे ही वाचा
मंत्रालयातील कुत्र्यांनी करायचे काय?
मंत्रालयात आता कुत्री, मांजरी यांना नो एन्ट्री; मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कडक
शिक्षक भरतीच्या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयात सुरक्षा जाळीवर घेतली उडी
मंत्रालयाबाबत पुढे बोलताना पटोले म्हणाले, ” आजच्या मंत्रालयाला पूर्वी सचिवालय नाव होते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्याचे नाव बदलून मंत्रालय असे केले, त्यामागे सर्वसामान्य जनतेला या वास्तूशी जोडण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. सरकार जनतेसाठी आहे, मंत्री महोदयांनी ते प्रशासनाच्या मदतीने चालवणे अपेक्षित आहे. असे असताना केवळ सुरक्षेचे कारण पुढे करुन व गर्दी कमी करायची यासाठी प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा प्रकार संताप आणणारा आहे.”
दरम्यान, पटोले यांनी राज्य सरकारवर आरोप करत सरकारी कामांच्या कंत्राट देण्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “राज्यातील सरकारने एका व्यक्तीला तिजोरीच्या चाव्या दिल्या असून हा सरकारचा दलाल निर्मल बिल्डिंगमध्ये बसून भरमसाठ किमतीला कंत्राटाचे वापट करतो. जनतेच्या घामाचा पैसा कंत्राटदारांना देऊन उधळपट्टी सुरु आहे. अशा दलालांना मंत्रालयात मुक्त वावर आहे आणि सर्वसामान्य जनतेला निर्बंध लावले जात आहेत. सरकारच्या या दलालाचा भांडाफोड काँग्रेस पक्ष लवकरच करणार आहे.”