मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उडी मारुन आंदोलन करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जीव धोक्यात घालून अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी सरकारने अखेर आता उपाययोजना सुरु केल्या आहेत. मंत्रालय प्रवेशाच्या नियमाबाबत मंगळवारी सरकारने एक शासनिर्णय देखील जाहीर केला असून त्याची तातडीने अंमलबाजावणी देखील सुरु झाली आहे.
मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उड्या मारुन आंदोलन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी विषेश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्याला उभी जाळी बसविण्यासंदर्भात उपाययोजना सुचविली. त्यानुसार तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे.
मंत्रालयात विविध कामे घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो लोक येत असतात. अनेकदा अधिकारी, मंत्र्यांची भेट न झाल्यास, ठोस आश्वासन न मिळाल्यास सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी लोक मंत्रालयात सुरक्षेच्या कारणास्तव बांधण्यात आलेल्या जाळीवर उड्या मारुन आंदोलन करतात. अशा प्रकारे आंदोलन करणे जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे शासनाने यावर कडक उपाययोजना करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मंत्रालयात दररोज साधारण 3500 हून अधिक अभ्यांगत विविध विभागात भेटीसाठी येत असतात. या गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकदा काही महत्त्वाची कामे घेऊन आलेल्या लोकांना तिष्ठत बसावे लागते. त्यामुळे काल शासनाने मंत्रालय प्रवेशासंबंधी एक शासननिर्णय देखील काढला आहे.
या शासन निर्णयात सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दल काही सुचना देखील संबंधित विभागांना दिल्या आहेत. मंत्रालयाच्या छतावर कोणी जावू नये या करिता उपाय योजना, खिडक्यांमधून कोणी उडी मारण्याचा प्रयत्न करु नये यासाठी उपाययोजना, फायर ऑडीट, चेक पॉईंट, खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत नियम, ड्रोनव्दारे नजर ठेवणे अशा अनेक बाबी या जीआरमध्ये आहेत.
हे सुद्धा वाचा
सामान्य जनतेसाठी मंत्रालयात हुकूमशाही, दलालांना मात्र मुक्त प्रवेश !
सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजा !
वेशीला टांगलेलं ‘सरकारी’ शिक्षण
काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील तरुणाने शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारुन आंदोलन केले होते. मागील आठ पंधरा दिवसांपूर्वी धरणग्रस्तांनी त्यांच्या मागण्यांसाठी जाळीवर उड्या घेऊन आंदोलन केले होते. मंत्रालयाच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणे, मंत्रालयात विषारी औषध घेऊन आत्महत्या करणे असे प्रकार देखील मागे घडले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत उपाययोजना सुरु केल्या आहेत. काल अंबाजोगाई येथील तरुणाच्या आंदोलनानंतर आज लगेचच असे प्रकार घडू नयेत यासाठी शासनाने उपाययोजना करत मंत्रालयाच्या गॅलरीला जाळी बसविण्याचे काम सुरु केले आहे. गॅलरीतून मंत्रालयाच्या जाळीवर कोणी उडी घेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने तातडीने ही कामे हाती घेतली आहेत.