राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच यामुळे राज्यातील अनेक लोकांना आणि प्राणिमात्रांना देखील आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी देखील झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात आतापर्यंत ३५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजार पेक्षा अधिक जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवस आता राज्यात पाऊस पडणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी राज्यामध्ये सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. जून महिन्याच्या सुरुवातीला हवा तसा पाऊस न पडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला होता. परंतु त्यानंतर मात्र राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला. तर राज्यातील काही भागात जोरदार अतिवृष्टी देखील झाली. पण आता गेल्या काही दिवसामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची राज्य सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात नांदेड, परभणी या भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. ज्यामुळे सोयाबीन आणि ज्वारीच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतात गुडगाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये निराशा हाती आली.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीनिमित्त तरुणांना दिली खुशखबर
Thane Crime : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहरात हत्येच्या घटनांनी उडाली खळबळ
दरम्यान, आता पावसामुळे झालेल्या या नुकसानामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन कमीत कमी त्यांची दिवाळी गोड करा, अशी मागणी देखील केली आहे.
यंदा झालेल्या या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक रस्त्यांची देखील दुरावस्था झालेली आहे. ज्यामुळे राज्यातील अनेक भागांमधून खड्डयांमुळे अपघात वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीसह इतर अनेक गोष्टींचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, आता पुढील काही दिवसात राज्यात पाऊस पडणार नसल्याची माहिती राज्यातील हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.