केंद्र सरकारमध्ये पुढील दीड वर्षामध्ये तब्बल 10 लाख पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील वेगवेगळ्या राज्यातील 75 हजार युवकांना आज (ता. 22 ऑक्टोबर) नियुक्तीपत्रे देण्यात आली. याचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आला. रोजगार मेळाव्याअंतर्गत या नोकर भरती करण्यात आलेल्या आहेत. पुढील 18 महिन्यांमध्ये या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरामधून निवडक तरुणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. ज्या तरुणांची या रोजगार मेळाव्याच्या अंतर्गत भरती होईल, त्यांना केंद्र सरकारमध्ये विविध स्तरावर सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आली आहे.
पुढील 18 महिन्यामध्ये केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेल्या जागा भरून काढण्यासाठी सध्या केंद्राच्या सर्वच विभागामध्ये यासाठी युद्ध पातळीवर काम करण्यात येत आहे. केंद्रातील सर्व मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरून काढण्याचे निर्देश याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देण्यात आले होते.
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, देशामधील नागरिकांसाठी गेल्या आठ वर्षामध्ये स्वयंरोजगाराची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आज आणखी भर पडली. विकसित भारत देशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भारत देश स्वावलंबनाच्या वाटेवर चालत आहे. या सर्वामध्ये देशातील नवीन उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादक यांचा फार मोठा वाटा आहे. तसेच यामागे गेल्या आठ वर्षांची देखील मेहनत आहे. तसेच गेल्या आठ वर्षांच्या मेहनतीमुळे आज भारत देश हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
IIT Kanpur Recruitment 2022 : आयआयटी कानपूरमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! वाचा संपूर्ण माहिती
Ashok Chavhan : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची अशोक चव्हाण यांची मागणी
येत्या दीड वर्षात ज्या काही भरत्या करण्यात येणार आहेत, त्या UPSC व इतर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सध्या देशातील तरुणांच्या कौशल्य विकासावर जोर देण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत तरुणांना देशात असलेल्या उद्योगांनुसार प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. याची एक मोठी मोहीम संपूर्ण देशभर राबविली जात असल्याचे देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले. यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये देशातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.