27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रनेमाडेंच्या वक्तव्याने समाजाचा आरसा स्पष्ट दिसला...

नेमाडेंच्या वक्तव्याने समाजाचा आरसा स्पष्ट दिसला…

नेमाडेंच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मुलाखती का? पुरस्कार मिळवण्यासाठी नेमाडे लॉबिंग करतात, सतत प्रसिद्धीच्या झोतात रहायला आवडते, नेमाडेंनी कुणालाही वर येऊ दिले नाही, मोदींकडून पुरस्कार का स्वीकारला? अॅवार्ड वापसीच्या वेळी पुरस्कार परत का दिला नाही? वगैरे प्रश्न आणि अनेक प्रकारचे विडंबन ऐकू येते आहे.

मी कोसला काॅलेजला असतांनाच वाचली होती आणि मला खूप राग आला होता की, हा माणूस खानदेशातील खेड्यांची किती बदनामी करतोय. मी दिवाकर चौधरी या माझ्या काकांजवळ हा संताप व्यक्त केला आणि ते शांतपणे म्हणाले, परत एकदा वाचून ये मग आपण चर्चा करू या. नंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा हिंदू कादंबरी आली तेव्हा कोसला परत वाचली आणि बऱ्याच गोष्टी वास्तववादी मांडणी वगैरे समजल्या. मग प्रश्न पडला की, वास्तववादी मांडणी का आवडत नाही, आवडत नाही म्हणण्यापेक्षा झेपतच नाही. का? कारण आदर्शवादाचा, महात्म्याचा एवढा मोठा पगडा आपल्या समाजावर आहे की, कादंबरीतलाही वास्तववाद आपल्याला झेपत नाही. हिंदू कादंबरी वाचली तेव्हा वाक्यावाक्यागणिक आलेले संदर्भ माहिती नव्हते. तेव्हा अशीही टिका झाली की ही फक्त तज्ञांसाठी आहे पण ते संदर्भ शोधून किती जणांनी वाचले असतील हा मोठाच प्रश्न आहे आणि ते शोधून काढून तपासून बघायची तयारी नव्हती म्हणून मग काहीही ताशेरे झाले, आणि खाजगी बाबी उकरून काढून त्यावर चोथाचर्वण झाले. या विवादातून काय चित्र दिसले ही बाबच खूप रोचक आहे.

खरे तर खेड्यात अस्तित्वात असलेली अठरापगड जाती आणि इतर जमातींचे वास्तव चित्रण यात आहे. ते चित्रण आपल्याला  समाजाचा आरसा दिसला. कालच्या  भाषणावरील प्रतिक्रिया आणि जातीवाचक, गटवाचक, द्वेषभावना यांचे दर्शन विविध पोस्ट वाचून मनोरंजन तर झालेच पण काही महाभागांनी ती मते काॅपीराईट वगैरे म्हणत, वृत्तपत्रांचे संदर्भ दिले, पण नेमाडेंनी उल्लेख केलेल्या पुस्तकाबाबत कुणीही बोलत नाही कारण स्पष्ट आहे की कुणीच ते वाचलेले नाही. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे आणि तथाकथित पत्रकार म्हणवणारे असेच हवेत तारे तोडत असतात, याचेच दर्शन झाले. या भाषणातही ते तरूण पिढीला पुस्तके वाचा म्हणजे सत्य समजेल हेच सा़ंगत आहेत, पण सल्ला कुणाला आवडतो? त्यांचे तरूणपणीचे अनुभव नमूद केले आहे.

नेमाडेंचे स्पष्ट मत आहे की, जर तुमच्या लिखाणावर चर्चा होत नसेल तर लिहुच नये. एका अर्थाने सर्वांना ढवळून काढत, कदाचित आपल्याला परत एकदा इतिहासाचे संदर्भ तपासून बघायची गरज आहे. पुरातत्वाचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात आली की, खुप संशोधन व लिखाण झाले आहे पण मराठीत नसल्याने मराठी लोक त्याच त्याच मुद्द्यांवर गुद्दे हाणत असतात, स्वतःला पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यात टिकेला जागाच नाही आणि ऊठसूठ लोकांच्या भावना दुखावल्या जातात. मध्ये एकदा एका लेखकाने सुदृढ टिका कशी समाप्त झाली,यावर लेख लिहीला होता. टिका ही अवघड बाब आहे, संपूर्ण वाड्मय समजून मगच लिहावे लागते, वरवर स्तुती करणे सोपे आहे आणि सध्या तेच होत आहे. नुसत्या लाइक्स, टिका करत कोण  ताप वाढवून घेणार? शिवाय धकाधकीच्या जीवनात वगैरे.. मॅडम हलके फुलके लिहत जा हो, येथे ज्ञान वगैरे कुणाला नको आहे असा सल्ला संपादकच देतात.

संवेदनशील मुद्दे टाळले जातात. स्रियांवर मंदिरात बलात्कार झाला, पेशवे लहान मुली मागवत, आजही तीनशेच्या वर मुली गायब होतात आणि त्यांना वेश्याव्यवसाय करावा लागतो, हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते, त्याविषयी एकही तथाकथित पत्रकार आणि पुरोगामी विचारक बोलले नाही, या गोष्टींना पुरावे नाहीत, ते इतिहासकार नाहीत असेच युक्तिवाद केला जातो. मानले की जरी पुरावे नाहीत तरी आजची स्रियांवर बलात्काराच्या घटना आणि परिस्थिती आपण स्विकारायलाही तयार नाही आणि उलट ते प्रश्न मांडणाऱ्यांना कोठडीत उभे करत आहोत.

हे सुद्धा वाचा 
पेशवे हे दुष्ट, नीच प्रवृत्तीचे होते; भालचंद्र नेमाडेंचं वक्तव्य, समाज माध्यमात नेमाडे यांच्यावर टीका
महात्मा फुले अभ्यासक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
हसमुख असलेल्या रामदास आठवले यांनी वाढवली शिंदे गटाची चिंता

दुसरा मुद्दा म्हणजे मात्र नेमाडेंच्या बेताल वगैरे वगैरे आणि प्रसिद्धी बद्दल भरपूर समाचार घेतला गेला. एकंदरीत जरी नेमाडेंच्या वक्तव्य इतके बेताल होते तर एवढे डोक्यावर घ्यायची काय गरज होती? रोज हजारो लोक हजारो वक्तव्य करत असतात. या परस्परविरोधी भूमिका स्वीकारताना  न्युनगंडातून आपल्याला आदर्शवादी बाबी दुखावल्या जातात, आणि असे काही सनसनीखेज बाबी हव्या असतात आणि गाव चौकात जशी चर्चा चालते तशीच माध्यमे करत असतात. या धुराळ्यामुळे आपल्या माध्यमांचा आणि समाजाचा चेहरा समोर आला. ज्या मुद्यांना संवेदनशील मुद्दे म्हणावे ते किती सहज आणि राजरोसपणे टाळले जातात. स्रियांवर बलात्कार होणे कुणालाही काहीही वाटत नाही आणि इतर बाबी कशा चर्चित होतात, हेच दिसले.

(लेखिका पुणेस्थित पुरातत्व आणि इतिहास अभासक आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी