29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रपवार साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

पवार साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ( Sharad Pawar ),

राष्ट्रीय नेते,

नवी दिल्ली.

महोदय,

आपण महाराष्ट्राचे जाणते राजे. आपल्याला स्वतःला जाणता राजा म्हणून घ्यायला आवडत नाही. परंतु वस्तुस्थिती तीच आहे साहेब. आपण महाराष्ट्राचे जाणते राजे आहात आणि शेवटपर्यंत राहणार. आपल्या या उपाधी बद्दल आपल्या विरोधकांच्या पोटात गोळा उठतो ( Sharad Pawar is a Janata Raja of Maharashtra ).

रेशीम बागेत आपल्याबद्दल प्रचंड असूया आहे. महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश करायचा आहे त्यांना. परंतु त्यामध्ये गेली ५० वर्षे आपण जिब्राल्टरसारखे भक्कमपणे उभे आहात.

या रेशीम बागेने आपल्याला महाराष्ट्रात नेस्तनाबूत करण्याचे असंख्य प्रयत्न केलेत. परंतु प्रत्येकवेळी आपण त्यांचे ‘बाप’ म्हणूनच सिद्ध झालात. काय नाही केले हो त्यांनी ? आपल्याला त्यांनी सतत बदनाम केले. भ्रष्टाचाराचे प्रचंड आकडे तयार केले. गो. रा. खैरनार, संत अण्णा हजारे यांना तुमच्यावर पाठविले ( Anna Hajare and G. R. Khairnar’s allegations on Sharad Pawar ). परंतु ते संपले, आपण मात्र प्रत्येक वेळी स्वच्छ प्रतिमेने पुन्हा पुन्हा जनतेच्यासमोर आलात.

साहेब, ज्यावेळी तुम्हाला कॅन्सर झाला त्यावेळी ही मंडळी देव पाण्यात ठेऊन बसली होती की कधी तुम्ही जाताय ( Sharad Pawar’s heath ). परंतु साहेब, तुम्ही त्यांनाच पाण्यात असे काय डुबविले की आता कुठे हे हळू हळू बाहेर यायला लागलेत.

साहेब, तुम्ही वैयक्तिक पातळीवर प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडलात. त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याला सुद्धा तुम्ही सुस्थितीत आणून ठेवले.

भारतीय राजकारणातील आपण सर्वात अनुभवी, ज्येष्ठ, संपूर्ण देशाचा अभ्यास असलेले, संकटमोचक, उत्कृष्ठ सामाजिक भाष्यकार, शेतीतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सहकारमहर्षी, परराष्ट्र धोरणातील अभ्यासक, संगीत कलाप्रेमी, खेळातील उत्तम प्रशासक,   प्रचंड स्मरणशक्ती असलेले, उत्तम वाचक, एक कुटुंबवत्सल असे तुमचे अनेक आयाम आहेत.

जिवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील भागात लिलया वावरणारे, आणि फक्त वावरणारे नाहीत तर उत्कृष्टपणे त्या त्या भागाची माहिती असणारे, माहिती ठेवणारे. साहेब, आपल्याबद्दल किती लिहावं, बोलावं.

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या वयापेक्षाही आमचं वय कमी आहे. परंतु जेव्हापासून थोडंफार राजकारण कळायला लागलंय तेव्हापासून शरद पवार हे नाव डोक्यात फिट बसलंय ( Sharad Pawar is a stalwart ). कधी कधी रागावतो आम्ही तुमच्यावर. खूप खूप राग येतो तुमचा. परंतु शेवटी तुम्हीच बरोबर होता हे कालांतराने सिद्ध होते आणि आम्ही गप्प बसतो.

आज आपले महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे. त्यात आपला वाटा सिंहाचा आहे. त्या जोरावरच आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. आपल्या या मेहनतीमुळे आपलं राज्य अर्धा उत्तरप्रदेश आणि अर्धा बिहार आज पोसतोय. या परप्रांतियांना आपल्या कष्टाबद्दल माहिती नाही. मुळात त्यांना महाराष्ट्राबद्दलच कमी माहिती आहे तो भाग वेगळा. असो.

साहेब, पत्र लिहिण्यास कारण की, सध्याच आपलं महाराष्ट्रातील महाआघाडीच सरकार हे फक्त आणि फक्त आपल्यामुळेच अस्तित्वात आहे ( Sharad Pawar is a creator of Mahavikas Aghadi Government ). आपल्यामुळेच तीन विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी महाराष्ट्रात सरकार दिलं. ही एक ऐतिहासिक घटना आहे.

साहेब, सध्या विरोधकांनी लोकांच्या मनात जाणीवपूर्वक एक संभ्रम तयार करून ठेवलाय की, हे सरकार पाच वर्षे चालेल का ? परंतु या प्रश्नाला सगळ्यांकडे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत हे सरकार पाच वर्षे आरामात टिकेल. नव्हे ते अजून पुढची पाच वर्षे सुद्धा पुन्हा असेल. साहेब हा विश्वास फक्त आपल्या कर्तृत्वावर आहे. शरद पवार साहेब आहेत तोपर्यंत काहीही चिंता नाही असे लोक छातीठोकपणे सांगतात.

उद्धव ठाकरेसाहेब आपल्या आशीर्वादाने आणि सहकार्याने उत्कृष्टपणे सरकार चालवीत आहेत ( Uddhav Thackeray leading Mahavikas Aghadi government properly ). आदित्य ठाकरेंच्या नावाने आपल्याला काहीतरी घबाड मिळेल या आशेवर विरोधक दिवस काढीत आहेत. परंतु आपण असल्यावर आदित्य ठाकरेंच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

साहेब, त्या काँग्रेसला सुद्धा आता जास्त त्रास देऊ नका. ऑलरेडी ते महाराष्ट्रात वैतागलेले आहेत. त्यांना जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. नव्हे ती काळाची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

शरद पवार म्हणाले, मी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांचे राम मंदीराबातचे वक्तव्य योग्यच

शरद पवारांनीच मान्य केले, महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे : चंद्रकांत पाटील

अजित पवारांना राज्यपालांनी मारली कोपरखळी

साहेब, या विरोधकांनी आता तुमच्या घरातच फोडाफोडी सुरू केली आहे. तुमच्या घरातच बंडाळी कशी होईल याची तयारी त्यांनी मागील काही वर्षांपासून सुरू केली आहे. पहिल्यांदा त्यांनी अजितदादांना ‘वश’ केले. त्या वशिकरणातून तुम्ही अजितदादांना अलगद बाहेर काढलेत. परंतु वशिकरणातील थोडी गुंगी अजूनही बाकी आहे.

पार्थ पवारचे आताचे एकंदर वागणे हे बंडखोरीचे आहे हे शेंबड्या पोराला सुद्धा समजते. ही बंडखोरी त्याची एकट्याची नाही. त्याच्यामागे संपूर्ण बागबगीचा आहे. हे आपणही चांगले जाणता आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय.

साहेब, आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की, तुमच्या या घरगुती भांडणात महाराष्ट्राचे वाटोळे होईल असे काहीही होऊ देऊ नका. त्या पार्थला तुम्ही सुरवातीलाच एकदम खासदारकीचे तिकीट दिलेत. तिथेच घोळ झाला. सत्तेची चटक फार भयंकर आहे साहेब.

अजितदादांकडे कोणत्याही पदाबाबत बोलायला गेले की ते लगेच म्हणतात, पहिल्यांदा तुम्हाला पक्षासाठी काम करावे लागेल. पदाचं नंतर पाहू. काम करण्याबाबत काहीच अडचण नाही. काम करावेच लागेल. पण प्रश्न असा आहे की हा न्याय सगळ्यांना लागू झाला पाहिजे. मग त्यांनी  स्वतःच्या मुलाबाबत वेगळा न्याय कसा काय लावला ? आपला तो बाब्या अन् दुसऱ्याच ते …. ( Ajit Pawar should apply NCP rules to Parth Pawar too )

साहेब, त्या पार्थला सांगा की, बाबा तुला कुठे जायचे तिकडे जा. तू कितीही जय श्रीराम करीत माळा जपत बस. तू कितीही ९६ कुळी असलास तरी तुला कोणीही सरसंघचालक करणार नाही.

साहेब, आपण अतिशय स्पष्ट आणि कडकपणे पार्थच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते त्याचे व्यक्तिगत मत आहे, पक्षाचा त्याचा काहीही संबंध नाही असे सगळ्यांनी ओवाळून टाकलेले वाक्य न बोलता आपण खणखणीत बोलला आहात. सलाम आपल्यातील पुरोगामीत्वाला. वेळप्रसंगी आपण किती कठोर व्यक्त होऊ शकता हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले.

साहेब, त्या पार्थला जाऊ द्या विरोधकांकडे. मग कळेल त्याला आपले स्वकर्तृत्व. शरद पवार नावाचं वलय आहे म्हणून दोन लोक ओळखतात तरी. नाहीतर ग्राम पंचायत सुद्धा नशिबी येणार नाही.

साहेब, आपण दूरदृष्टीने निर्णय घेणारे नेते आहात. परिणामाची पर्वा न करणारे. तुम्ही त्याला सरळ पक्ष सोडायला सांगा अथवा पक्षातून काढून टाका. साहेब, आता हा तुमचा घरगुती प्रॉब्लेम नाही. तो संपूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम झाला आहे. आपण किती दिवस पार्थला पकडून ठेवणार ? ज्या दिवशी त्याने जय श्रीराम केले त्याच दिवशी त्याने बाय बाय श्री शरद पवार केले आहे. आपल्याला दिलेलं ते उघड उघड चॅलेंज आहे. साहेब, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. साहेब, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला समजते ते आपल्यासारख्या चाणक्याला समजतच असेल ना ?

साहेब , तुम्हाला सगळं समजतंय. परंतु ते तुम्ही नेहमीप्रमाणे सहन करताय. साहेब, कशासाठी सहन करताय ? जागा दाखवून द्या प्रत्येकाला प्रत्येकाची. होऊन जाऊद्या एकदाचं समोरासमोर. रोज एक नवी पुडी सोडली जाते की ४५ आमदार घेऊन जाणार, सरकार पडणार वगैरे वगैरे. अशा स्वप्नात वावरणाऱ्या लोकांना झोपेतून गदागदा  हलवून उठवा आणि द्या हाकलून त्यांना.

Mahavikas Aghadi

साहेब, आपल्यासारख्या राजघराण्यातील भांडणे / मतभेद हे फक्त आणि फक्त सत्तेसाठीच असतात. ती आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसारखी घरगुती भांडणे नसतात. एवढया पैशात हा महिना कसा चालवायचा अशासारखी भांडणे आपल्यासारख्यांच्या घरात कधीच होत नाहीत .

साहेब, हे सरकार कसेही करून पाच वर्षे टिकलेच पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत ते टिकेलच यात तिळमात्र शंका नाही.

साहेब, केंद्रातील ‘ते’ दोघे काहीही करतात. मध्यप्रदेश, कर्नाटक लक्षात आहे ना ?  महाराष्ट्रात तुम्ही आहात म्हणून कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. परंतु साहेब, तुमचंही वय वाढत चाललंय. तुम्हाला जास्त दगदग सहन होत नाही. आपल्याकडे असलेल्या प्रचंड मोठ्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपण हे सर्व करीत आहात. हे आम्ही सर्वजण जाणतो.

साहेब एक सांगतो, महाराष्ट्रातील सरकार टिकलं तर केंद्रातील सरकार पडणार आहे. त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी तर आहेच. परंतु महाराष्ट्राच्या प्रती एक मोठं उत्तरदायित्व सुद्धा आहे.

विरोधकांना टक्कर देणारा एकच माणूस म्हणजे शरद पवार. साहेब, तुम्हाला टेन्शन देण्याचं काम विरोधक करीत आहेत. आपल्याला या वयात मानसिक त्रास देऊन आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा डाव आहे त्यांचा. आपल्याला मानसिकदृष्ट्या अशांत करणे हा यांचा पेशवाई डाव आहे. आपण यांच्या डावाला बळी पडू नका.

छत्रपती शिवराय, फुले – शाहू – आंबेडकर यांचा खरा वारसा चालविणारे आपण आहात. आपल्याविना महाराष्ट्र गाडा न चाले. आपण महाराष्ट्राची आन, बान आणि शान आहात. पुरोगामी विचारांची मंडळी आपल्याकडे नेहमीच मोठ्या आशेने पाहतात. आपल्यावर त्यांचा मोठा विश्वास आहे. सरकार पाच वर्षे टिकलेच पाहिजे. नव्हे ते टिकविणे आपले आद्य कर्तव्यच आहे.

साहेब, टिकवाल ना पाच वर्षे सरकार ?

आपला निस्सीम चाहता,

ॲड. विश्वास काश्यप,

मुंबई / पुणे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी