टीम लय भारी
पुणे : जे लोक सारखे सारखे सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेले भांडे कधी आवाज करत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे.
इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या. हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे, असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.
आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेले नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. करायचा तेवढा आवाज करा, सरकार पडलं तर बघू काय करायचं, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौ-यावरही भाष्य केले. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार, याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?,” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महाआघाडी सरकारचे कौतुक केले. देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपले पुणे हवेहवेसे वाटतेय, असा टोलाही त्यांनी लगावला.