32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeराजकीयबावनकुळेंच्या 'धाब्या'वरून ट्विटरवर 'काव्य'युद्ध, सुप्रिया सुळे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटरवर खडाजंगी

बावनकुळेंच्या ‘धाब्या’वरून ट्विटरवर ‘काव्य’युद्ध, सुप्रिया सुळे आणि आशिष शेलार यांच्यात ट्विटरवर खडाजंगी

‘पत्रकारांना चहा पाजायला न्या, धाब्यावर न्या’ या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरून ट्विटरवर चांगलेच काव्ययुद्ध जुंपले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हेरंब कुलकर्णी यांची ‘चला, आपण धाब्यावर जाऊ’ ही कविता ट्विटरवर शेअर केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ‘चला मटण खाऊन देवदर्शनाला!’ ही कविता शेअर केली आहे. ही कविता दासराम वरकर्णि यांची असल्याचेही नमूद केले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या ‘चहा’मंत्रावरून बावनकुळे चांगलेच अडचणीत सापडलेत आणि तीन दिवसांपासून टीकेचे धनी ठरलेत. दरम्यान, आज सुप्रिया सुळे यांनी थेट हेरंब कुलकर्णी यांची कविता शेअर केल्यामुळे चिडलेल्या भाजप नेत्यांनीही सुप्रिया सुळेंना टार्गेट करणारी कविता शेअर केलीय.

अहमदनगरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चहापानाचा मंत्र दिला. भाजपविरोधात २०२४ पर्यंत एकही विरोधात बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, असा मोलाचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. तेव्हापासून बावनकुळेंवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात भर टाकली ती हेरंब कुलकर्णी यांच्या ‘चला, आपण धाब्यावर जाऊ’ या विडंबनात्मक कवितेने. ही कविता म्हणजे भाजपवर टीकेची आगच म्हणावी लागेल.

या कवितेचा आशय खालीलप्रमाणे आहे,

दारू दुकाने वाढवण्याची, निषेधार्ह बातमी दाखवू का?
समृध्दी महामार्गावर, अपघात का बरे वाढले?
न्यायमूर्ती लोया नागपुरात, नेमके कशाने वारले?
शेतकरी आत्महत्या भागात, दौऱ्यावर कधी जाऊ या?
अच्छे दिन आता सांगा ना कधी येणार?
९ वर्षांपासून लावलेल्या स्वप्नांची रोपटी आता कधी वाढायची?

असे अनेक प्रश्न हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेत उपस्थित करण्यात आलेत. आणि नेमकी हिच कविता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. थेट मर्मावर घाव केल्याने या कवितेला उत्तर म्हणून आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करणारी एक कविता शेअर केली आहे. आता या कवितेचा आशयही पाहुया

मटण खाऊन कसं देवदर्शन करणार!
ताईंचं पंचांग “हेरंब” लिहितात, मटण खाऊन सॅनिटायझर लावून ताई खुशाल देव दर्शन करतात.
डावी बाजू सांगायला पण ताईंना एखादे “कुलकर्णी”च हवे असतात!
नागपूरचे सावजी खाताना कुणी “गोवारीं”बद्दल विचारले…
कोल्हापूरात तांबडा-पांढरा पिताना “दाऊद” बद्दल कुणी छेडले
किंवा
मुंबईत मालवणी मटण खातान कुणी “भूखंडांच्या श्रीखंडा”वरुन प्रश्न केले
तर…
ताई हसत हसत एक “सेल्फी” काढतात.
“मटण” खातांना आता “श्रीखंड” कशाला?
असा विनोद करुन स्वत:च हसत बसतात!!

थोडक्यात बावनकुळेंच्या ‘चहा आणि धाबा’ या वक्तव्यावरून भाजपची चिंता वाढलीय. त्यातच विरोधकांनीही घेरल्यामुळे आणखी पंचाईत झाली आहे. त्यातच आता भाजपला टार्गेट करणारी कविताही व्हायरल होऊ लागल्याने भाजपची कोंडी होताना दिसत आहे. आणि त्यावरून ट्विटरवरून काव्ययुद्धाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा

मुख्यमंत्री शिंदेंनी २५ लाख दिले नाहीत, रुसवा मात्र शरद पवारांवर!

सामान्य जनतेसाठी मंत्रालयात हुकूमशाही, दलालांना मात्र मुक्त प्रवेश !

मंत्रालयातील कुत्र्यांनी करायचे काय?

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी