अल्पवयीन विवाहितेच्या हत्येने मुंबईतील चेंबूर चांगलेच हादरून गेले आहे. या प्रकरणाची केवळ पोलिसांनीच नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा दखल घेतली आहे, त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादमध्ये मोडत असून सदर विवाहितेची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी आक्रमक भूमिका भाजकडून घेण्यात येत आहे. या मागणीबाबत बोलताना भाजपनेते नितेश राणे यांनी या प्रकरणात पोक्सो आणि अॅस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा असेच थेट पोलिसांना सांगितले आहे. विवाहितेच्या हत्येचे प्रकरण सगळ्याच स्तरातून गांभीर्याने घेतले जात असल्याने याप्रकरणी आता नेमकी कारवाईची पावले कशी टाकली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुलाचा ताबा देत नाही, शिवाय धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही म्हणून एका इसमाने आपल्या पत्नीची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना चेंबूरमध्ये घडली. पहिल्या पत्नीकडून मूल होत नाही म्हणून इक्बाल शेख नावाच्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले. मुलगी वेगळ्या धर्माची होती परंतु शेख यांनी मुलाच्या हव्यासापोटी आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या लग्नाला साधारण तीन वर्षे झाली होती, त्यांना दोन वर्षांचा मुलगा सुद्धा आहे.
दरम्यान लग्नानंतर त्या मुलीला मुस्लिम रीतीरिवाज करायला जमत नव्हते आणि हेच कारण त्यांच्या भांडणासाठी पुरेसं ठरत होतं. धार्मिक रीतीरिवाज पाळत नसल्याने इक्बाल शेख यांचा राग वाढत चालला होता त्यामुळे कायम त्यांच्यात भांडणंच पाहायला मिळत होतं. परिणामी गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघे विभक्त झाले होते. दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी इक्बालने त्याच्या विभक्त झालेल्या अल्पवयीन पत्नीस नागेवाडी भागात भेटण्यासाठी बोलावले आणि कोणताही मागेपुढे विचार न करता भर रस्त्यावर तिची गळा चिरून हत्या केली आणि तेथून पळ काढला.
हे सुद्धा वाचा…
Chandrakant Khaire : ‘ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा’
Pune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं…
अचानक झालेल्या या हल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, परंतु पोलिसांना इक्बालला पकडण्यात लगेचच यश आले आणि त्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे अवघे चेंबूर हादरून गेले आणि स्थानिकांकडून मुलीच्या न्यायासाठी एकच मागणी सुरू झाली, त्यांच्या सूरात सूर मिसळत भाजप सुद्धा मुलीच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करीत आहेत.
दरम्यान, काल पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि नितेश राणे पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी पोहोचत सदर कुटुंबियांचे सांत्वन करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असे आश्वासन दिले, तर निलेश राणे यांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत मयत मुलीबाबत अॅट्रॉसिटी, पोस्को का लावला नाही? असा सवाल करीत पोलिसांनाच धारेवर धरले आहे. त्याचवेळी मुलीच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.
भाजपनेते निलेश राणे पुढे म्हणाले, रुपाली यांच्या वडिलांना आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण दिलं पाहिजे. मुलगी अल्पवयीन आहे, पण अजून पोस्को अंतर्गत कलम लावण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा देखील नोंद करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार असून चेंबुर प्रकरणासंबंधी संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सुद्दा राणे यांनी म्हटले आहे.