राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा गांधींची आज जयंती. ज्या थोर पुरुषाने राष्ट्रघडणीत आपले महत्त्वाचे योगदान दिले त्यांचे पुन्हा स्मरण आजच्या दिवशी संपुर्ण देशभरातून करण्यात येत आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. दरवेळी प्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत महात्मा गांधी यांच्याविषयी कमी शब्दांत भरभरून लिहिले आहे, त्यामुळे त्यांची ही पोस्ट नेटकऱ्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरत आहे. यावेळी लिहिताना राज ठाकरे यांनी गांधीजींसारखा बहुधा दुसरं कोणी होणे नाही असे म्हणून त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून गांधीजयंतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी लिहिताना राज ठाकरे म्हणतात, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही, असे म्हणून राज ठाकरे यांनी गांधीचींच्या साता समुद्रापार पोहोचलेल्या कार्याला सलाम केला आहे.
हे सुद्धा वाचा…
Mumbai News : चेंबूर हत्याकांड प्रकरणाची सत्ताधाऱ्यांकडून दखल
Chandrakant Khaire : ‘ठाकरे परिवाराच्या विरोधात बोलाल, तर याद राखा’
Pune Bridge : पुणेकरांची कोंडी करणारा पूल क्षणार्धात उद्धवस्त, वाचा नेमकं काय घडलं…
पुढे राज ठाकरे लिहितात, विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल, जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली.ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं.
शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन असे म्हणून महात्मा गांधींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन या महापुरुषांचे कौतुक केले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी करून त्यामध्ये हे आपले म्हणणे मांडले आहे, तसेच आज लालबहादूर शास्त्री यांची सुद्धा आज जयंती आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे यांनी अभिवादन केले आहे.