31 C
Mumbai
Tuesday, March 19, 2024
Homeराष्ट्रीयPhulandevi : सामान्य महिला असलेल्या फुलनदेवीवर डाकू होण्याची वेळ का आली ?

Phulandevi : सामान्य महिला असलेल्या फुलनदेवीवर डाकू होण्याची वेळ का आली ?

फुलनदेवीची ओळख चंबळच्या खोऱ्यातील डाकूराणी अशी आहे. मात्र तिला डाकू बनवण्यामध्ये समाजाचा मोठा हात आहे. कोणी जन्मत: डाकू, लुटारु म्हणून जन्म घेतं नसतं. आपल्याला फुलनदेवी हा शब्द उच्चारला तर एक भयानक व कुरूप चेहरा दिसतो. हे खरे असले तरी, जातिव्यवस्था, गरिबी, उच-नीच, भेदभाव, स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, यौनशोषण, बालविवाह, कर्मठपणा, अज्ञान, रूढी-परंपरांनीच तिला इतकं टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडलं. फुलनेदवी शेवटपर्यंत लढली.

या ठिकाणी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने जिवन संपविले असते. पण फुलनदेवीने हार मानली नाही. तिच्या डाकू असण्याचं समर्थन करता येणार नाही. फुलनदेवी घरातील सगळी कामं करत असायची. दुसऱ्यांच्या शेतात राब-राब राबायची. गाई-म्हशी सांभाळायची, शेतातून गवत कापून आणायची, चूलीसाठी लाकडं आणायची. वडिलांसोबत गवंडी काम करायची. आशा प्रकारे गरीबीमध्ये कष्टाचे जिवन जगत असायची. मात्र एका सामूहिक बलात्कारानंतर तिचे संपूर्ण जिवन बदलून गेले. उत्तर प्रदेशातील एका गरीब कुटुंबात फुलनदेवीचा जन्म झाला. तिच्या वडिलांचा मासेमारी किंवा नावड्याचा व्यवसाय होता. तिचा जन्म मल्लाह जातीमध्ये झाला.

वसंतोत्सवाच्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव ‘फुलन’ ठेवण्यात आलं. तिचे वडील खूपच गरीब होते. तर आई स्वभावानं कडक शिस्तीची होती. ती कोणालाही घाबरत नसे. फुलनला तीन बहिणी आणि एक भाऊ अशी चार भावंडं होती. फुलन दोन नंबरची मुलगी होती. फुलनच्या वडिलांची सगळी शेतजमीन त्यांच्या सख्या भावाने कपटाने घेतली होती. तो त्यांना नेहमी धमक्या देत असे. तो नेहमी फुलन व तिच्या बहिणीला मारत असे. त्यांना शेतात पाय देखील ठेवू देत नसे. आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. त्यांना कधी कधी उपाशीही राहावं लागतं असे.

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनचं लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसोबत झालं (तिच्या नवऱ्याचं नाव पुट्टीलाल). त्यानं वयात येण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं. त्यानंतर तिचं यौनशोषण सुरु झालं. तिचा मानसिक, शारिरीक छळ केला. तो तिला नेहमी मारहाण करत असे.

त्याच्या त्रासामुळे फुलन दोन-तीन वेळा घरातून पळून माहेरी आली. परंतु तिला घरच्यांनी पुन्हा पतीकडे पाठवलं. पण नंतर तिचा नवरा तिला एका बोटीवर सोडून पळून गेला. नंतर त्यानं तिकडे दुसरं लग्न केलं. त्यानंतर फुलनदेवी तिच्या गावी परत आली आणि पुन्हा पहिल्यासारखी कामं करू लागली. पण आता गावकरी तिचा छळ करू लागले. नवरा सोडून आलेली बाई म्हणून तिला हिणवू लागले. तिला गावातून हाकलून लावा असं म्हणू लागले. कारण नवरा नसलेली बाई गावात राहणं ही त्यांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट नव्हती. गावातील सरपंच, पाटील आणि तिचा चुलत भाऊ तिला धमकावू लागले.
वयाच्या १५ व्या वर्षी तिच्यावर सरपंचाच्या मुलाने बलात्कार केला. परंतु तिच्या आई वडिलांनी त्याला जाब विचारला नाही. तिच्या बाजूने कोणीच उभे राहिले नाही. करण तो सरपंचाचा मुलगा होता.

या घटनेनंतर तिने पोलिसांकडे मदत मागितली. परंतु पोलिसांनी देखील हात वर केले. काही दिवसांनंतर फुलन तीच्या बहिणीच्या गावी गेली. इकडे सरपंच आणि तिच्या चुलत भावाने तिच्यावर डाकू असण्याचा खोटा आरोप लावून तिला व तिच्या वडिलांना पोलिस ठाण्यात टाकतात. तिथे काही पोलीस अधिकारी तिच्यावर बलात्कार करतात. तिच्यावर अनेक जण
अत्याचार करतात आणि तिला धमकीही देतात. कोणाला सांगू नकोस. ती भीतीमुळे आपणं डाकू असल्याचे कबूल करते. काही महिने जेलमध्ये राहते. नंतर तिची आई कर्ज काढून तिची जामीनावर सुटका करते.जेलमधून सुटल्यावर ती तिच्या गावी येते. पण इकडे सरपंच आणि तिचा चुलत भाऊ काही शांत बसत नाहीत. ते तिला ठार करण्यासाठी बाबू गुज्जर या डाकूला सुपारी देतात. नंतर काही डाकू येऊन फुलन व तिच्या आई-वडिलांना खूप मारहाण करतात.

तिला आपल्यासोबत घेऊन जातात. बाबू गुज्जरसुद्धा तिच्यावर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच गँगमधला एक डाकू (विक्रम मल्लाह) बाबू गुज्जरला ठार करतो. फुलनला वाचवतो. कारण तो फुलनच्या जातीचा असतो. पुढे तो फुलनशी लग्न करतो. तिला आपल्या गँगमध्ये सामिल करून घेतो. येथून फुलन डाकू बनते. त्यांची गँग अनेक गावांमध्ये जाऊन धाडी टाकते. श्रीमंतांना लुटून गरिबांना काही पैसे देते. गरिबांवर कोणी अत्याचार केला तर त्याला शिक्षा करते. अनेक गरीब मुलींचं लग्न लावून देते. ते गरिबांसाठी एक प्रकारे मसीहा बनतात.डाकू बनल्यानंतर फुलन पुट्टीलालनं केलेल्या अत्याचाराचा सूड घेण्याचं ठरवते. ती त्याला ठार करते. सरपंच, पाटील व चुलतभाऊ यांना मारते.

पुढे विक्रम मल्लाहचा मित्र असलेला डाकू श्रीराम (ठाकूर) विक्रम मल्लाहला ठार मारतो. फुलनला नग्न करून गावात फिरवतो. तिच्यावर अनेक जणांना बलात्कार करायला लावतो आणि तिला एका बंद खोलीत कोंडून ठेवतो. एके दिवशी एका ब्राह्मण व्यक्तीच्या मदतीनं फुलन तेथून पळून जाते. ही बातमी कळताच श्रीराम त्या ब्राह्मण व्यक्तीला जिवंत जाळतो.
तेथून पळून जाऊन फुलन काही डाकूंची मदत घेऊन एक नवीन गँग बनवते. ती श्रीरामनं केलेल्या विक्रमच्या खुनाचा व तिच्या सोबत केलेल्या बलात्काराचा सूड घेण्याचं ठरवते. ती श्रीरामला शोधत शोधत एका गावात येते. त्या गावामधील २२ ठाकूरांना गोळ्या घालून ठार करते.

कारण त्यांनी श्रीरामला लपण्यासाठी मदत केलेली असते. ही बातमी वेगानं देशभरात पसरते. पोलिसांचा बंदोबस्त वाढतो. फुलनला पकडण्यासाठी सरकारने एक लाखाचं बक्षीस जाहीर केले. पण फुलन कोणाच्याच हाती लागत नाही. श्रीरामला शोधत असतानाच तिला महिती मिळते की, श्रीराम ठाकूरला त्याच्याच भावानं ठार केलं आहे. पोलीस इकडे फुलनचा शोध घेत असतात. ती त्यांना जिंदा किंवा मुर्दा हवी असते. फुलनवर खूप दबाव निर्माण होतो. ती विचारात पडते. तिच्या कुटुंबावरही खूप अत्याचार होतात. त्यामुळे फुलन आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेते. १२ फेब्रुवारी १९८२ रोजी ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांच्यासमोर आत्मसमर्पण करते. तेव्हा तिला बघण्यासाठी हजारो लोक येतात. तिला ११ वर्षं विनाखटला जेलमध्ये राहावं लागतं.

१९९४ मध्ये तिच्यावरील सर्व आरोप माफ होतात. ती जेलमधून मुक्त होते. १९९४ साली फुलन देवीची सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी तिला भेटून तिला स्वत:बद्दल पुस्तक लिहिण्याची विनंती केली. फुलनला पुस्तक म्हणजे काय हेसुद्धा माहिती नव्हतं. तिनं संमती दिल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी फुलनची कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड केली आणि नंतर शब्दांत उतरवून पुस्तकरूपानं प्रकाशित केली. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी दोन वर्षं लागली. नुकताच मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. फुलनच्या आयुष्यावर शेखर कपूर यांनी ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट बनवला. चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं प्रत्येक दृश्य बघून अंगावर काटा येतो.

गुन्हेगार किंवा समाजाशी विद्रोह करणारे लोक हे आपल्याच समाजाचे घटक असतात. ते अचानक गुन्हेगार का बनतात? याचं उत्तर म्हणजे फुलनदेवीची कहाणी आहे. एका गरीब घरातली शेतात काम करणारी मुलगी हातामध्ये बंदूक घेते. या गोष्टीला समाज कसे जबाबदार आहे. हे फुलनदेवीच्या कहाणीमधून आधोरेखीत होते. फुलनदेवीच्या आयुष्याचा अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी, पोलीस, डाकू आणि डाकूंचा राजकारणासाठी केला जाणारा उपयोग करणारे मतलबी सत्ताधारी आणि सगळयांमुळे एका स्त्रीचा जाणारा बळी अंतर्मुख करणारा आहे.

फुलनदेवी १९९६ साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत जाते. १९९९ साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येते. २५ जुलै २००१ रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली जाते. १९७६ ते १९८३ या काळात चंबळच्या खोऱ्यात डाकूराणी फुलनदेवीचं राज्य होतं. दहशत होती. फुलनचा बालपणापासून ते शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू इथपर्यंतचा प्रवास काळजाला चटका लावणारा आहे. फूलनदेवीची दहशत शोलेमधल्या गब्बर सिंहपेक्षाही जास्त होती. फूलनदेवीचा नेम अचूक होता. तिच्याकडे पाषाणहृदयी बाई म्हणून पाहिले जाते. पण तिला इतकं असंवेदनशिल बनवण्यात समाजाचा हात आहे. तिच्यावर आलेल्या वाईट परिस्थितीनेच तिला इतकं निष्ठुर आणि क्रुर बनवलं.

बहमईमध्ये जेव्हा तिने 22 ठाकुरांना एका रांगेत उभं करून ठार मारलं. त्यावेळी ती डगमगली नाही.आत्मसमर्पण केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संपवतील. भीती तिला होती म्हणून तिने मध्य प्रदेश सरकारसमोर आत्मसमर्पणाचा प्रस्ताव मांडला. मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्यासमोर फूलनदेवीने एका कार्यक्रमात आत्मसमर्पण केलं. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
त्यावेळी तिने कपाळावर लाल रंगाचं कापड बांधलं होतं.

हातात बंदूक घेऊन जेव्हा ती स्टेजच्या दिशेने गेली, तेव्हा सर्वांनी श्वास रोखून धरला होता. तिने आपली बंदूक कपाळाला टेकवली आणि नंतर अर्जुन सिंह यांच्या समोर ठेवली. फूलन देवीच्या आत्मसमर्पणानंतर चंबळच्या खोऱ्यात डाकूंच्या टोळ्यांची दहशत हळूहळू संपुष्टात यायला लागली. फुलनदेवीचा जन्म १० ऑगस्ट १९६३ मध्ये झाला. तर २५ जुलै २००१ मध्ये तिचं देहावसन झालं.

हे सुद्धा वाचा 

‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

अगला स्टेशन ‘ मातोश्री’…? असं कसं घडू शकतं ? (दिवाकर शेजवळ)

GST Collection 2022 : महाराष्ट्राच्या जीएसटीने केंद्र झाले मालामाल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी