भारतीय संघ सध्या खराब नशीबाशी झुंज देत आहे. टीम इंडियाचा माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यापासून संघाला एका यष्टीरक्षक आणि फिनिशरची उणीव भासत आहे. तेव्हापासूनच संघाने अनेक प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे 2022च्या आयपीएल हंगामात दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दाखवलेल्या उत्कृष्ट फॉर्ममुळे ही कमी पूर्ण होईल अशी सर्वांना आशा लागली होती. मात्र, दिनेश कार्तिकला संघात केवळ फिनिशरची भुमिका दिली जात असल्याने संघव्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) दिनेश कार्तिकला भारतीय संघात फिनिशरची भूमिका देण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कार्तिकने फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावार यावे आणि त्याला इतक्या खालच्या फलंदाजीसाठी पाठवू नये, असे त्याने म्हटले आहे.
खरं तर, आयपीएलनंतर दिनेश कार्तिकला संघात आणले गेले कारण तो शेवटच्या 3-4 षटकांमध्ये फलंदाजी करून फिनिशरची भूमिका बजावेल. कार्तिककडे बघितले तर सामना संपवण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो फक्त काही चेंडू खेळत सामना फिरवू शकतो परंतु असे काही वेळा घडले आहे की जेव्हा तो क्रीजवर आला तेव्हा खूप उशीर झाला होता.
हे सुद्धा वाचा…
Job Updates : UPSC ‘जिओ सायंटिस्ट’च्या जागांसाठी मोठी भरती
मॅथ्यू हेडनच्या मते, कार्तिकला फलंदाजी क्रमात वरच्या स्थानावर पाठवले पाहिजे. अक्षर पटेलला कार्तिकच्या आधी मोहालीत पाठवल्यामुळे मॅथ्यू हेडन खूश नव्हता. तो म्हणाला की, “मी दिनेश कार्तिकच्या भूमिकेबद्दल विचार करत होतो. त्याला वरच्या स्थानावर फलंदाजीसाठी का पाठवले जात नाही हे मला समजत नाही. मी कार्तिकचा अपमान करत नाही, फक्त त्याला फलंदाजीसाठी अधिक संधी मिळाव्यात असे मला म्हणायचे आहे पण उलट घडत आहे. माझ्या मते कार्तिक इतका चांगला खेळाडू आहे की तो पहिला आल्यानंतरही चांगले शॉट्स खेळू शकतो.”
दरम्यान, दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका बजावली होती आणि शेवटच्या षटकांमध्ये धावा केल्या होत्या. त्याने आयपीएल 2022 मध्ये 16 सामन्यांमध्ये 183.33च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. याच कारणामुळे तब्बल 3 वर्षानंतर कार्तिकचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले. मात्र, भारतीय संघात दिनेश कार्तिकला केवळ फिनिशरची भुमिका दिली जात आहे.
विशेष म्हणजे आधी रविंद्र जडेजा आणि आता अक्षर पटेल सारख्या अष्टपैलू खेळाडूंना कार्तिकपूर्वी फलंदाजीची संधी दिली जात आहे. त्यामुळे टी20 विश्वचषक अगदी तोंडावर असताना टीम इंडियाला अजूनपर्यंत संघाची अचूक प्लेइंग 11 मिळाली नसल्याचे हे उदाहरण असल्याचे क्रिकेट जाणकार सांगत आहेत.