हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 88 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिका जिंकली. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया आता 2-0 ने पुढे आहे. प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीतच्या नाबाद 143 धावांच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर 334 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 44.2 षटकांत 245 धावा करून बाद झाला. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने 57 धावांत चार बळी घेतले. भारतीय महिला संघाने तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडच्या धर्तीवर मालिका जिंकली आहे. याआधी भारताने 1999 मध्ये एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती.त्यामालिकेत अंजुम चोप्रा हिने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते.
हे सुद्धा वाचा…
Job Updates : UPSC ‘जिओ सायंटिस्ट’च्या जागांसाठी मोठी भरती
Dasara Melava 2022 : तुला नाय मला…! दसरा मेळाव्यासाठी ठाकरे – शिंदेंची झाली मोठी पंचाईत
ED & NIA Raid : ईडी, एनआयएच्या गळाला मोठा मासा, 20 जण अटकेत
फलंदाजीसाठी निमंत्रित झाल्यानंतर भारताला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा (08 धावा) केट क्रॉसच्या गोलंदाजीवर बसला. त्यानंतर स्म्रीती मंधाना आणि यास्तिका भाटिया यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी (54 धावा) भागीदारी केली. पण 12व्या षटकात बाद होणारी भाटिया संघाची दुसरी खेळाडू होती. त्यानंतर मंधानाने 51 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह 40 धावांचे योगदान दिले. पूजा वस्त्राकरने 18 धावा केल्या तर दीप्ती शर्मा 15 धावांवर नाबाद राहिल्या. इंग्लंडचे पाच गोलंदाज लॉरेन बेल, केटी क्रॉस, फ्रेया केम्प, चार्ली डीन आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
त्यानंतर 334 धावांच्या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाला 44.2 षटकांत केवळ 245 धावांपर्यंत मजल मारण्यात आली. यावेळी इंग्लंडसाठी डॅनियल वॅटने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे भारतासाठी गोलंदाजीत रेणूका सिंगने 10 षटकांत 57 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. शिवाय डी हेमलताने 2 तर दिप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले.
भारतीय खेळाडूंच्या या अष्टपैलू प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय महिला संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 88 धावांनी मोठा विजय मिळाला. या मालिकेत सध्या टीम इंंडियाकडे 2-0 अशी विजयी आघाडी आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना शनिवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडला व्हाऊट वॉश देण्याच्या तयारीत असेल.