आक्षेपार्ह वक्तव्ये, टीईटी घोटाळा, कृषी महोत्सव गायरान जमीन घोटाळा आदीमुद्द्यांवरुन सध्या अडचणीत सापडलेले राज्याचे कृषी मंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar accuses) यांनी मोठा आरोप केला आहे. माझ्याच पक्षातील नेत्यांकडून माझ्याविरोधात कट रचला असल्याचा आरोप त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्यामुळे शिंदे गटात (Shinde group) देखील दुही पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत विधीमंडळात गायरान जमीन घोटाळा, कृषी महोत्सव तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षांच्या हिटलीस्टवरच अब्दुल सत्तार असल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मात्र आपल्याच पक्षातील आमदारांवर आरोप करत ज्यांना सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही अशा लोकांकडूनच कट रचला जात असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
मंत्र्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये, जमीन घोटाळे, सीमावादावरुन गाजले हिवाळी अधिवेशन
आधारकार्ड सोशल मीडियावर शेअर करु नका; गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास येथे करा संपर्क
टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर मोठ्याप्रमाणावर आरोप होत आहे. दरम्यान यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचे सांगत माझ्यावरील सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचे देखील सत्तार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना सत्तार म्हणाले, मी अल्पसंख्यांक व्यक्ती असल्याने तसेच मंत्रीपदावर बलल्याचे अनेकांना पाहवत नाही, त्यामुळेच माझ्याविरोधात कारस्थाने रचली जात आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या आमच्या पक्षातील बैठकांचे मुद्दे बाहेर येत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना बोललो असून चौकशी करण्याची देखील मागणी केली असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.