लयभारी न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळावर मराठा समाजाचा वरचष्मा असल्याचे सिध्द झाले आहे. ४३ सदस्यांच्या मंत्रिमंडळात तब्बल २३ मंत्रिपद एकट्या मराठा समाजाच्या आमदारांना देण्यात आले आहे. यामुळे मंत्रिमंडळावर मराठा समाजाचा दबदबा असल्याचे सिध्द झाले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी खातेवाटप करण्यात आले. विशेष म्हणजे राज्याच्या जनतेला याची प्रतिक्षा लागलेली होती. आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्षांनी मराठा समाजाला मंत्रिमंडळात प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीच्या वाट्यास १६ मंत्रिपदे आली. त्यात ८ मराठा समाजाचे आहेत. काँग्रेसने आपल्या कोट्यात ७ मराठा मंत्री केले आहेत. शिवसेनेने ८ मराठा आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे.
अनुसूचित जमातीला केवळ एकच मंत्रिपद….
अनुसूचित जमातीला ७ टक्के राजकीय आरक्षण आहे. मात्र, काँग्रेसचे के. सी. पाडवी हे आदिवासी समूहातून आलेले एकमेव मंत्री आहेत. वंजारीपेक्षा राज्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. सरकारमध्ये दोन वंजारी व एक बंजारा मंत्री असून धनगर समाजाचे दत्ता भरणे हे एकमेव मंत्री आहेत.
अनुसूचित जातीचे तीन मंत्री…
अनुसूचित जातीला तीन मंत्री लाभले आहेत. काँग्रेसने वर्षा गायकवाड व नितीन राऊत या बौद्धधर्मीयांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने संजय बनसोड या मराठवाड्यातील नवबौद्ध समाजातील आमदारास मंत्री केले आहे. शिवसेनेकडे एकही मंत्री अनुसूचित जातीतील नाही हे विशेष.
ओबीसी समाजाचे ४ मंत्री…
राज्यात इतर मागासवर्गीय समाज (ओबीसी) ५२ टक्के असल्याचा काही संघटनांचा दावा आहे. मात्र, मंत्रिमंडळात छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, आदिती तटकरे आणि विजय वडेट्टीवार अशा चार ओबीसी आमदारांची मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे.
तीन महिला मंत्रींना संधी….
सर्व जातगटांमध्ये मिळून तीन महिलांना मंत्री म्हणून प्रतिनिधित्व लाभले आहे. यामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (मराठा), वर्षा गायकवाड (नवबौद्ध) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे (ओबीसी) आहेत.
मुस्लिम समाजाचे चार मंत्री…
मुस्लिम समाजाचे मंत्रि आहेत. .अस्लम शेख ( काँग्रेस ), नवाब मलिक ( राष्ट्रवादी काँग्रेस) हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी काँग्रेस ), अब्दुल सत्तार ( शिवसेना)