राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. अवकाळीने मका, गहू, हरभरा, कापसाचं मोठं नुकसान झाल्याने बळीराजावर आभाळ कोसळलंय. दरम्यान महाअर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखूनही गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यामुळे विरोधकांनी शासनाला खडे बोल सुनावले आणि विधासभेत याविरोधात निदर्शने देखील करण्यात आले.
दरम्यान आजपासून जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीला जोर धरत राज्यात सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत, तर नाशिकहून हजारो-लाखों शेतकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. या अनुषंगाने शेतकऱ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना योग्य न्याय न मिळाल्यास राज्यभरात कुर्सी छोडो आंदोलन करू, असे वक्तव्य काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
केंद्र सरकार असो वा महाराष्ट्र सरकार दोन्ही शेतकरी विरोधी आहेत. राज्य सरकार शेतकर्यांना मदत करत नाही, शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा आम्ही राज्यभर ‘कुर्सी छोडो आंदोलन’ करू, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.
दरम्यान मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या महाघोटाळ्याविरोधात मौन धारण केलेल्या भाजप सरकारच्या विरोधात काल (13 मार्च) राजभवनावर काँग्रेसच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सामील झाले.
गिरगाव चौपाटी ते राजभवन येथे हा मोर्चा काढून काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना निवेदन दिले. या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज (बंटी) पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ये रिश्ता क्या कहलाता है… मोदी अदानी भाई भाई, देश बेचके खाई मलाई… अशा घोषणा मोर्चेकरी देत होते. त्यांच्या हातात मोदी व अदानी विरोधी घोषणांचे बॅनर होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली.
हे सुद्धा वाचा :
पुन्हा एकदा मुंबईत लाल वादळ धडकणार; राज्यात शेतकरी आंदोलनाचा एल्गार
18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प
शेतकरी आंदोलन पुन्हा पेटणार? पाच शेतकरी संघटनांचा संसद भवनावर मोर्चा