“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या जो विचका झाला आहे तसा मी ह्या आधी कधीच पाहिला नव्हता. आता जनतेनेच यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे, अन्यथा ह्यांना असंच वाटत राहणार की आमचं कोणीच वाकडं करणार नाही. जनतेने वेळीच पाऊल उचललं नाही तर महाराष्ट्राचं राजकारण अजून गाळात जाईल”, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, “वरती केंद्रात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून खाली जे वाट्टेल ते सुरु आहे ते चूकच आहे. आणि फक्त आजच्यापुरता विचार करून चालणार नाही. आज अनेक तरुण तरुणी राजकारणात येऊ इच्छित असतील तर त्यांच्यासमोर काय आदर्श आपण ठेवतोय? त्यांच्यासमोर जर शिवीगाळ करणारे, एकमेकांना वाट्टेल ते बोलणारे असे आदर्श असतील तर ते तरी का येतील राजकारणात”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
“मी जे आधी बोलतो ते कालांतराने लोकांना पटतं. मी जे बोलतो ते कायम विचारपूर्वक बोलतो. मराठा आरक्षणाबद्दल मी आधीच बोललो होतो, तसंच मतदान पण ईव्हीएमच्या ऐवजी मतपत्रिकेवर घ्या हे मीच आधी बोललो होतो. जगभरात सर्वत्र जर मतदान मतपत्रिकेवर होत असेल तर ते भारतात ईव्हीएमवर का हा माझा प्रश्न तेंव्हाही होता आणि आज पण आहे. मध्यंतरी एक बातमी आली होती की मतदान झाल्यावर तुम्हाला एक स्लिप येणार, त्याचं काय झालं?”, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.
…तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे
राज ठाकरे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची स्थिती भीषण आहे, अनेक भागांत दुष्काळ आहे, ह्या सगळ्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्रात मराठी मुलामुलींना उत्तम शिक्षण मिळत नसेल त्यांना नोकऱ्या मिळत नसतील आणि महाराष्ट्र इतकं समृद्ध राज्य असून जर असं होत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे”
एखादा माणूस इतक्या थराला का जातो?
“आपल्याकडचे महापुरुष आपण जातींमध्ये विभागून टाकलेत. कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज महाराज आठवलेत. महाराजांचं नाव घेतलं तर मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटत असावं म्हणून ते बहुधा त्यांचं नावच घेत नव्हते आणि आता अचानक त्यांना महाराजांची आठवण येत आहे. आमदार गणपत गायकवाडांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला, एखादा माणूस इतक्या थराला का जातो ह्याचा विचार पण करावा लागेल. इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची स्थिती कोणी आणली ह्याची पण चौकशी व्हावी”, असे मत राज ठाकरेंमी मांडले.
किती राजकारण्यांना मराठीचा अभिमान आहे?
“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला हवा पण आज किती राजकारण्यांना मराठीचा अभिमान आहे, किती प्रेम आहे त्यांना भाषेबद्दल? अशी लोकं काय मराठी भाषेसाठी पाठपुरावा करणार आहेत. मी नेहमी सांगतो की राज्यात हे तिथलेच स्थानिक पक्ष हवेत. कारण त्यांना त्या राज्याविषयी, त्या राज्याच्या भाषेविषयी आस्था असते”, असे मत ठाकरेंनी मांडलं आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : “तुतारी जनतेला प्रेरणा देईल”, शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास