पुलवामा घटनेमागे एक मोठे षडयंत्र आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसतर्फे उद्या सोमवारी १७ एप्रिल रोजी ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, बॅनरखाली राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
ते म्हणाले, पुलवामा घटनेने सारा देश हादरला होता. सीआरपीएफच्या ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले. एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो RDX वापरण्यात आले. ते कुठून आले? जवानांना विमानसेवा का पुरवली नाही? गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? पुलवामा घटना ही सरकारची चुक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत.
सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात एका मुलाखतीत उपस्थितीत केलेले प्रश्न अत्यंत गंभीर व देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजपा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांच्या षडयंत्राला बळी पडणार नाही. पुलवामा घटनेचे सत्य बाहेर आणण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल.
हे सुध्दा वाचा :IPL 2023: लाइव्ह मॅचमध्ये कोहलीची गांगुलीला खुन्नस; हस्तांदोलनही टाळले!
या आंदोलनात जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल, विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असे पटोले यांनी सांगितले.