संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावर संजय राठोड यांनी काहीही न बोलण्याची काल भूमिका घेतली होती. आज मात्र त्यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता आपली भूमिका मांडली आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. माझ्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. केवळ आरोप झाला होता. पोलीस यंत्रणा व न्याय व्यवस्थेला माझी निष्पक्ष चौकशी करता यावी म्हणून मी मागच्या सरकारमध्ये राजीनामा दिला होता. पोलिसांची चौकशी पूर्ण झालेली आहे. या चौकशीचा अहवाल आलेला आहे. त्यात मी दोषी नसल्याचे सिद्ध झाल्याचे स्पष्टीकरण राठोड यांनी दिले आहे.
लोकशाहीत आरोप करताना काही लागत नाही. पण पुढच्या काळात कुणी बोलले तर मी कायदेशीर कारवाई करेन, असा गर्भित इशारा राठोड यांनी चित्रा वाघ यांना नाव न घेता दिला.संजय राठोड पुढे म्हणाले की, मागील सरकारमध्ये आरोप झाल्यानंतर मी स्वतः राजीनामा दिला होता. मी मंत्रिपदावर राहिलो तर चौकशी निष्पक्ष होणार नाही, माझ्याकडून दबाव येईल असे वाटायला नको म्हणून मी स्वतः राजीनामा दिला होता. आता चौकशीत माझे निर्दोषत्व सिद्ध झालेले आहे.
हे सुद्धा वाचा
Chitra Wagh On Sanjay Rathod : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले
Chitra Wagh Vs Sanjay Rathod : चित्रा वाघ यांच्या आरोपावर संजय राठोड यांचे ‘दोन शब्दांचे’ उत्तर !
मी चार वेळा निवडून आलेलो आहे. माझ्या मतांची संख्या बघा. मी ३० वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मी भटक्या विमुक्त व मागासवर्गीय समाजातून येतो. माझ्याकडून माझ्या समाजाच्या व मतदारांच्या फार अपेक्षा आहेत. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोन्ही माझे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी माझी सगळी कागदपत्रे पाहिली आहेत. त्यानंतरच माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.
मी मेहनती व कष्टाळू मनुष्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भल्यासाठी मला बरेच काम करायचे आहे. सामान्य जनतेसाठी मी भरपूर काम करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली आहे. येथून पुढे मी जबाबदारीने काम करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ते काम मी करून दाखवेन, असेही राठोड म्हणाले.
शिवसेनेचे आम्ही ४० आमदार व १० अपक्ष आमदार अशा आमच्या ५० आमदारांमध्ये एकोपा आहे. आम्ही एकत्र वावरत आहोत. मला मंत्रीपद दिले म्हणून कुणीही नाराज नाही. सगळ्या ५० आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. आमदारांच्या बैठकीत ठरल्यानुसारच मंत्र्यांची नावे अंतिम झाली आहेत. अधिवेशनानंतर पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी अन्य सदस्यांनाही संधी दिली जाणार असल्याचे राठोड म्हणाले.