एकनाथ शिंदे सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण दिवसभर दोन नावे चर्चेत राहिली. अब्दुल सत्तार व संजय राठोड. या दोन्ही मंत्र्यांभोवती वाद चिकटलेला आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होईल, असे वाटले होते. पण प्रत्यक्षात दोघांनाही मंत्रीपदे दिली गेली. त्यामुळे सामान्य लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येवू लागल्या. या तप्त वातावरणात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोड यांच्याविषयी संतप्त भावना व्यक्त करून आगीत तेल ओतले. त्यामुळे तर संजय राठोड प्रकरणाचा भडका उडाला. उलटसूलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येवू लागल्या.संजय राठोड यांच्यावर एकेरी शब्दांत चित्रा वाघ यांनी तोफ डागली. एक व्हिडीओसुद्धा त्यांनी रिलिज केला.
पुजा चव्हाण या भगिणीच्या आत्महत्येला संजय राठोड हा माजी मंत्री जबाबदार आहे. तो पुन्हा मंत्रीमंडळात सामाविष्ठ झाला हे दुर्दैव आहे. ‘हम लढेंगेभी और जितेंगेभी’ अशी गर्जना चित्रा वाघ यांनी केली. साहजिकच यावर संजय राठोड काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. संजय राठोड यांना माध्यमांनी गाठले. खोदून खोदून त्यांची प्रतिक्रिया विचारली. पण संजय राठोड काहीच बोलेनात. फारच आग्रह धरल्यानंतर ‘नंतर बोलू’ अशी दोन शब्दांची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाला होता. या आरोपानंतर राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांच्या समर्थकांनी राठोड यांना जोरदार पाठींबा दर्शविला होता. त्यांचे तेव्हाचे हे शक्तीप्रदर्शन अंगलट आले होते. त्यामुळे आता मात्र त्यांनी आळीमिळी गुपचिळी अशी भूमिका स्विकारल्याचे दिसत आहे.
संजय राठोड यांच्या मदतीसाठी सगळेच सरसावले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राठोड यांची जोरदारपणे बाजू लावून धरली आहे. गिरीश महाजन यांनीही राठोड यांची बाजू उचलून धरली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संजय राठोड हे कधीच दोषी नव्हते, असे म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी बेफाम आरोप केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपचे नेते एखाद्याचे कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त करून टाकतील, असा संताप सुद्धा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा
VIDEO : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले
एकनाथ शिंदे म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली होती. परंतु लोकशाहीमध्ये भावना व्यक्त करायचा कुणालाही अधिकार आहे. कुणाच्या काही तक्रारी असतील, म्हणणे असेल तर ते आम्ही नक्की ऐकून घेऊ, असे त्यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात म्हटले आहे.दीपक केसरकर म्हणाले की, संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत. बंजारा समाजाची किती बिकट स्थिती आहे ते एकदा पाहा. बंजारा समाजातून पुढे आलेल्या कर्तृत्ववान राठोड यांना केवळ राजकीय कारणास्तव विरोध करणे हे योग्य नाही.
चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली भूमिका हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या चौकशीत राठोड दोषी नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
शंभूराज देसाई यांनीही चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांचा चौकशी अहवाल आलेला आहे. त्यात ते दोषी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्यांच्यावर आरोप केले जात असतील तर ते चुकीचे आहे, असे देसाई म्हणाले आहेत.