28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयहे तर चोरांचे विधिमंडळ, राऊतांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल

हे तर चोरांचे विधिमंडळ, राऊतांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधारी गटातील आमदारांनाही विरोधकांच्या रणनीतीला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिल्याने विधानसभेत वादळी चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तिखट शब्दांनी बेजार झालेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर हक्कभंग दाखल केला आहे. विधिमंडळाबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याचे भाजपने म्हंटले आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. हे विधिमंडळ नाही, तर चोरांचे मंडळ आहे असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राऊतांवर परखड भाषेत टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांच्या विधानावर भाजपचे नितेश राणे आणि शहाजीबापू पाटील यांनी तोंडसुख घेतले आहे. (sanjay raut slams bjp भाजपचा हल्लाबोल)

संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला आहे. हे चोरांचे विधिमंडळ आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस गटाने आक्रमक भूमिका घेत राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या विधानाबाबत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात आक्रमक प्रतिक्रिया दिली. तसेच विरोधकांच्या हक्कभंगाच्या कारवाईच्या मागणीबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी काय म्हणालो होतो, हे आधी समजून घेतले पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जातं. ज्या पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही आमदार विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी तेथे सरकार स्थापन केलं आणि आमच्यावर ते आता हल्ले करत आहेत. विधिमंडळाबाहेर त्यांचा उल्लेख चोर, दरोडेखोर केला जातो. ही लोकभावना आहे. त्यांना उद्देशून मी ते विधान केलं होते. खरं तर या लोकांमुळे आज विधिमंडळाची बदनामी होत आहे”.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीदेखील संजय राऊतांवर निशाणा साधला असून ते वैफल्यग्रस्त झाल्याचे विधान केले आहे. संजय वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. त्यामुळे राऊतांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल, अशा बोचऱ्या शब्दांत भरत गोगावले यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा 

हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही, संजय राऊत

शिंदे-फडणवीस सरकारने ST कर्मचाऱ्यांना सोडले वाऱ्यावर; कोर्टाच्या आदेशानुसार पगार वेळेत, मात्र 780 कोटींची PF, ग्रॅच्युईटी थकविल्याचे विधानसभेत केले मान्य!

तुम्हाला देश सतत पेटता ठेवायचा आहे का? हिंदू संस्कृतीला खुजेपणा आणू नका; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे कान टोचले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी