टीम लय भारी
मुंबई : विधानपरिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती ( Vidhanparishad Election ) प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. परंतु या नियुक्त्यांमध्येही राज्यपाल कोलदांडा घालतील अशी भिती ‘महाविकास आघाडी’च्या नेत्यांना वाटत आहे. राज्यपालांचा संभाव्य कोलदांडा लक्षात घेऊन ‘महाविकास आघाडी’चे नेते सावध पाऊले टाकत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यपालांकडून नियुक्त्या केल्या गेलेल्या 12 आमदारांचा कालावधी येत्या 6 जून रोजी संपुष्टात येत आहे. यात काँग्रेसचे 5, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 व रिपब्लीकन पक्षाच्या (कवाडे गट) एका आमदारांचा समावेश आहे. 12 पैकी राहूल नार्वेकर व रामराव वडकुते यांनी राजीनामा दिल्याने या दोन जागा अगोदरच रिक्त झालेल्या आहेत.
रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पाच महिन्यांपूर्वी आदिती नलावडे व शिवाजीराव गर्जे या दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी ( Vidhanparishad Election ) राज्य सरकारने शिफारस केली होती. पण सहा महिन्याचाच कालावधी उरला असल्याने राज्यपालांनी या दोन सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली नव्हती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीची दोन वेळा शिफारस करण्यात आली होती. त्यावरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता.
या सदस्यांच्या पदांचा कार्यकाळ कमी राहिला म्हणून राज्यपालांनी मान्यता दिली नव्हती असे बोलले जाते, पण आणखीही एक कारण चर्चेत आले होते. विज्ञान, साहित्य, कला, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रातील व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती केली जाते. या कारणास्तव सुद्धा राज्यपालांनी नलावडे व गर्जे यांच्या नियुक्तीला मान्यता दिली नव्हती.
राज्यपालांची आता भूमिका काय असणार ?
राज्यपाल नियुक्त सदस्यांची मुदत येत्या 6 जून रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर रिक्त होणाऱ्या जागांसाठी राज्य सरकारकडून बारा नावांची शिफारस लवकरच होण्याची शक्यता आहे. भारतीय राज्य घटनेतील कलम 171 नुसार विज्ञान, साहित्य, कला, सहकार सामाजिक कार्ये या क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती ( Vidhanparishad Election ) करण्याची तरतूद आहे.
परंतु या पदावर राजकीय व्यक्तीची नियुक्ती करण्याचा प्रघात कित्येक वर्षांपासून पडलेला आहे. मात्र यावेळी राज्यपाल नियमाचा बडगा उगारतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यपालांची पक्षपाती भूमिका
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तीचा आदर केला जातो. त्यांनी यापूर्वी कोणत्याही पक्षाचे काम केले असले तरी राज्यपाल पदाची सूत्रे स्विकारल्यानंतर ते निःपक्षपाती आहेत असे समजले जाते. राज्यपालांनी घटनेला अनुसरून काम करणे अपेक्षित असते.
विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मात्र भाजपचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे वागतात. सहा महिन्यांपूर्वी सरकार स्थापनेचा गोंधळ झाला होता. त्यात राज्यपालांचा पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून आला होता.
दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात ढवळाढवळ केली होती. शरद पवार यांनी गेल्या महिन्यांत राज्यपाल समांतर यंत्रणा तयार करीत असल्याची तक्रार नरेंद्र मोदींकडे होती.
राज्यपाल हे प्रतिष्ठेचे पद असते. पण कोश्यारी यांनी या पदाचा सन्मान, प्रतिष्ठा घालवली आहे. त्यामुळे सन्मानाचे पद असूनही कोश्यारी यांच्यावर समाजातून जाहीर टीका केली जाते.
विधानपरिषदेतून निवृत्त होणारे आमदार
विधानपरिषदेतील 12 जागांपैकी दोघांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे. उर्वरीत 10 जणांचा येत्या 6 जून रोजी कार्यकाळ संपणार आहे. यांत काँग्रेसच्या हुस्नभानू खलिफे, अनंत गाडगीळ, प्रा. जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील व रामहरी रूपनवर यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीच्या सहा जागांपैकी प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे या चार जणांचा कालावधी संपत आहे, तर रिपब्लीकन पक्षाच्या जोगेंद्र कवाडे यांचाही कार्यकाळ संपत आहे.
कुणाच्या वाट्याला किती जागा ?
या 12 जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला येतील. परंतु नुकत्याच झालेल्या 9 जागांच्या निवडणुकीत ( Vidhanparishad Election ) शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली होती.
काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केले होते. पण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीमुळे काँग्रेसने एका जागेवरील मागणी सोडली होती.
परंतु आताच्या निवडप्रक्रियेत ( Vidhanparishad Election ) काँग्रेसला पाच, तर राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा दिल्या जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिवसेनेला चार जागा मिळतील.
राज्यपालांच्या संभाव्य कोलदांड्याची अनेकांना धास्ती
आपल्याला आमदारकी मिळावी म्हणून तिन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घालून ठेवले आहेत. परंतु राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीसाठी राज्यपालांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इच्छुकांनी राज्यपालांच्या संभाव्य भूमिकेची चांगलीच धास्ती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा
Shameful : नितिनजी गडकरी, तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? : राष्ट्रवादीचा घणाघात https://t.co/ofXkcvmU8g@VikasLawande1 @nitin_gadkari
— Lay Bhari (@LayBhari3) May 22, 2020
हे सुद्धा वाचा
Shameful : नितिनजी गडकरी, तुम्हाला लाज कशी वाटत नाही ? : राष्ट्रवादीचा घणाघात
Covid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार
‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’
Maharashtra Governor is BJP agent, must be sacked: UP Congress leader