‘चॅटजीपीटी’ची मूळ कंपनी ‘ओपनएआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन सध्या भारतात आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे समजते. जग बदलण्याची क्षमता असलेल्या ‘चॅटबॉट’चा निर्माता असलेल्या या तरुण उद्योजकाने ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘एआय’च्या भविष्याविषयी अनेक बाबी सांगितल्या. ‘एआय’मुळे काही नोकऱ्या जाणारच, हेही ऑल्टमन यांनी स्पष्ट केले.
‘एआय’मुळे अनेक मानवी नोकऱ्या धोक्यात असण्याची शक्यता सॅम ऑल्टमन यांनी यापूर्वी अनेकदा मान्य केली आहे. तथापि, AI मधील तेजीमुळे, नवीन नोकर्यांचे पर्यायाही निर्माण होतील, असा दावा त्यांनी आता भारतात केला आहे. ऑल्टमन म्हणाले की AI मुळे ‘काही नोकऱ्या’ जातील; परंतु नवीन अनेक पर्याय देखील तयार होतील. ते म्हणाले, “दोन पिढ्यांमध्ये, प्रत्येक तंत्रज्ञान क्रांतीमुळे नोकरीत बदल होतो. कामगारांना नेहमीच वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीशी आणि तंत्रज्ञानाच्या बदलांशी जुळवून घ्यावे लागते. अशा बदलांमुळे नवीन नोकऱ्यांचे वेगळे पर्याय पुढे येतात. त्या संधी सहसा चांगल्या असतात. इथेही तेच होणार आहे. काही नोकऱ्या जाणार आहेत; पण नवीन, चांगल्या नोकऱ्या येतील, ज्यांची कल्पना करणे आज कठीण आहे.”
excited to visit israel, jordan, qatar, the uae, india, and south korea this week!
— Sam Altman (@sama) June 4, 2023
सॅम ऑल्टमन यांनी या मुलाखतीत AI नियमनाबद्दलही सांगितले. अलीकडेच अमेरिकी लोकप्रतिनिधी गृहासमोर त्यांनी भूमिका मांडली होती. ‘ओपनएआय’चे नियमन सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकी सरकारला सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले होते. एआय नियमांबद्दलच्या या चर्चेचे माध्यमांनी ठळक मथळे केले होते. मात्र, बाजारातील मोठ्या कंपन्यांसाठी लहान कंपन्यांना एआय नियमांबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी ‘ET’च्या मुलाखतीत म्हटले आहे. ते म्हणाले, “छोट्या कंपन्यांवर कोणतेही नियमन नसावे. आम्ही केवळ स्वतःसाठी आणि बड्या कंपन्यांसाठी नियमन करण्याची मागणी केली आहे.”
सॅम ऑल्टमन हे AI वर विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी जगभरात फिरत आहेत. भारत भेटीदरम्यान, पंतप्रधानांसह उच्च सरकारी अधिकाऱ्यांना भेटायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या भारत भेटीबाबत ट्विट केले होते. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले होते की, सॅम ऑल्टमन हा ‘स्मार्ट माणूस’ असला आणि त्याच्याकडे एआय नियमनाबद्दल काही कल्पना असल्या तरी, भारताची स्वतःची काही मते आणि धोरणे आहेत. भारतातही काही स्मार्ट मेंदू आहेत आणि एआय कसे आहे, याबद्दल आमची स्वतःची मते आहेत, असे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा :
चॅटजीपीटी एआय चॅटबॉट्समुळे Gmailच्या शेवटाची घटिका समीप
AI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा टॉम हा पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी ट्विट
पाच ट्रेंडस् जे बदलवून टाकतील आपले ऑनलाईन जीवन
AI साठी संयुक्त राष्ट्र (UN) सारखी एक आंतरराष्ट्रीय स्वायत्त नियमन संस्था असावी, असे सॅम ऑल्टमन यांचे मत आहे. दुसरीकडे, भारतातील डिजिटल नागरीकांसाठी, इंटरनेट सुरक्षित आणि विश्वासार्ह व्हावे म्हणून पावले उचलण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, अशी भारत सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सॅम ऑल्टमन यांच्या भारत भेटीतून काय निष्पन्न होते, त्याबाबत उत्सुकता आहे.