मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गडचिरोली येथील दौरा आटोपून मुख्यमंत्री वर्षावर आले. त्यानंतर त्यांनी त्यांची पत्नी लता, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत, स्नुषा वृषाली यांनी प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबिय आपले औक्षण करताय हे पाहून शेतकरी बांधव आणि त्यांचे कुटुंब हरखून गेले होते.
वर्षा निवासस्थानी राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांसमवेत दिवाळी https://t.co/WZjghVbtOh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 25, 2022
सर्वत्र दिवाळीचा उत्साह आणि धामधुम सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेले वर्षा निवासस्थान आज गजबजून गेले होते ते राज्यातून आलेल्या बळीराजाच्या आगमनाने. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्नीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. पहिल्यांदाच अशा स्वरुपाची दिवाळी वर्षा येथे साजरी झाल्याचे अनेकांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. बळीराजा हा राज्याच्या विकासात महत्वाचा घटक असून त्याच्यासाठी आम्ही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यांमुळे बळीराजाला नैसर्गीक आपत्तीला तोंड द्यावे लागते. याप्रसंगी मी आपणा सर्वांना ग्वाही देतो की, तुम्ही धीर सोडू नका, खचू नका..आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत.
राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यात आली. सेंद्रीय शेतीवर भर देतानाच विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना मंजूरी देऊन लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आणि कृषि विकासासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
— हे सुद्धा वाचा :
Anandacha Shidha : आनंदाच्या शिधाचा आनंद गरिबांना मिळालेला नाही : मनिषा कायंदे
Eknath Shinde : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
Pune News : ‘पतीला पुराव्याशिवाय दारुडा म्हणणे ही क्रुरता’- मुंबई उच्च न्यायालय
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दुधे दाम्पत्याला दिवाळी फराळ भरवला. वर्षावरील हिरवळीवर शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमरावतीच्या अर्चना सवाई आणि अहमदनगरचे सतीष कानवडे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंद अडसुळ आदी उपस्थित होते.