पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून संसदेत घमासान सुरूच आहे. या मुद्द्यावरून मोदी सरकारची जाम पंचाईत झालेली दिसतेय. आता अदानीवरून राहुल गांधींचे पंतप्रधानांना 7 प्रश्न चर्चचा विषय ठरले आहेत.
राहुल गांधी यांनी लोकसभेत एक विशेष छायाचित्र दाखवले. या छायाचित्रात गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी हे एकत्र खास विमानात मित्रांप्रमाणे रिलॅक्स मूडमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना 7 प्रश्न विचारले आहेत.
देशातील जनतेनेही मोदींना हे 7 प्रश्न विचारावेत, असे आवाहन राहुल यांनी केले आहे. मोदींना विचारलेले 7 प्रश्न असे –
- अदानीच्या देशाबाहेर काही शेल (बनावट) कंपन्या आहेत, असे हिंडनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. या कंपन्या कोणाच्या आहेत ते मोदी सरकारने सांगावे.
- शेल कंपन्यांमधून नेमका कोणाचा पैसा भारतात येतो?
- भारताची बंदरे, विमानतळ, संरक्षण क्षेत्र आता अदानीच्या ताब्यात आहे. तनरीही आतापर्यंत भारत सरकारने त्यांच्या या शेल कंपन्यांबद्दल कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. हा खरेतर अत्यंत गंभीर असा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे.
- पंतप्रधान महोदय, परदेश दौऱ्यांमध्ये किती वेळा अदानी तुमच्यासोबत होते?
- मोदीजी, परदेश दौऱ्यांमध्ये अदानी तुम्हाला किती वेळा भेटले?
- पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांनंतर, अदानीने किती वेळा त्या देशांना भेट दिली?
- अदानीने भाजपला किती पैसे दिले आहेत? अदानीने इलेक्टोरल बाँडमध्ये किती पैसे दिले आहेत?
हे सुध्दा वाचा :
“नरेंद्र मोदी कायर’’; राहुल गांधी यांची घणाघाती टीका
राहुल गांधी यांनी विचारलेल्या या अडचणीच्या प्रश्नांवरून आता मोदी सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. अदानी म्हणजे मोदी सरकारसाठी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असे झाले आहे. संसदेत त्यामुळे सत्ताधारी अत्यंत बचावात्मक पवित्र्यात आहेत. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशा अदानीच्या लोंढण्यावरून अनेक वरिष्ठ भाजप नेते आणि संघही मोदी-शाह जोडगोळीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या कोंडीबरोबरच, सोशल मीडियातील भक्त मंडळीही सध्या अदानी प्रकरणावरून थंडावली आहे.