टीम लय भारी
मुंबई : ‘कोरोना’बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मुंबईतील सगळ्या रूग्णालयांमधील बेड व्यापले गेले आहेत. त्यामुळे नव्या रूग्णांना बेड उपलब्ध करणे कठीण होत आहे. त्यामुळे उत्तम प्रकृतीच्या ‘कोरोना’ रूग्णांवर घरीच उपचार केले जाणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope ) यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
रूग्णालयात भरती झाल्यानंतर उपचार सुरू केल्यानंतर ज्या ‘कोरोना’बाधित रूग्णांची तब्येत चांगली आहे, अशाच रूग्णांना घरी पाठविले जाईल. त्यांना ‘होम कॉरन्टाईन’ केले जाईल. घरातच त्या रूग्णावर उर्वरीत उपचार केले जातील, असे टोपे ( Rajesh Tope ) म्हणाले.
मुंबईत जवळपास 83 ते 84 टक्के रूग्ण असे आहेत, की त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे नाहीत. या रूग्णांची तब्येत उत्तम आहे. त्यामुळे अशा रूग्णांवर उपचार करून त्यांना ‘होम कॉरन्टाईन’ करणे अधिक चांगले राहील अशी सरकारची व महापालिकेची भूमिका असल्याचे ते ( Rajesh Tope ) म्हणाले.
गंभीर रूग्णांसाठी जास्तीत जास्त गुणात्मक उपचार करण्यावरही आम्ही भर दिला आहे. ऑक्सीजन सुविधा असलेल्या बेड्सची संख्या वाढवत आहोत. त्यामुळे गंभीर रूग्णांवर उपचार करण्याचे प्रमाण वाढले आहे.
रूग्णांची वाढती संख्या चिंताग्रस्तच, पण घाबरण्याचे कारण नाही
मुंबईत रूग्णांची संख्या वाढत आहे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे. परंतु घाबरण्याचे कारण नाही. रूग्ण वाढत असले तरी त्यांचा मृत्यू झाला नाही पाहीजे यासाठी पूर्ण खबरदारी आम्ही घेत आहोत. त्यात आम्हाला यश येत असल्याचे टोपे म्हणाले.
दुसऱ्या देशांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती उत्तम
अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांतील परिस्थिती व महाराष्ट्रातील परिस्थितीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. या देशांमध्ये मृत्यूचा दर मोठा आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण कमी आहे.
रूग्णालये वाढवत आहोत
जास्तीत जास्त रूग्णांना सामावून घेण्यासाठी आम्ही रूग्णालयांची संख्या वाढवत आहोत. बीकेसी, वरळी, गोरेगाव अशा विविध ठिकाणी मोठ्या क्षमतेची रूग्णालये उभारली जात आहेत. त्यामुळे वाढत्या रूग्णांना सामावून घेता येईल, असे टोपे ( Rajesh Tope ) यांनी सांगितले.
खासगी रूग्णालयांतील 80 टक्के जागा सरकारी नियंत्रणात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या दरांतच ‘कोरोना’ रूग्णांवर उपचार करणे त्यांच्यावर बंधनकारक केलेले आहे.
दुसऱ्या बाजूला ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’अंतर्गत राज्यातील सगळ्या जनतेला सामावून घेतलेले आहे. त्यामुळे निवडक 1000 रूग्णालयांमध्ये कोविडसह 1200 आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. अगदी टाटा, बिर्ला व अंबानी सुद्धा या योजनेमुळे मोफत उपचार घेऊ शकतात, असे टोपे म्हणाले.
हे सुद्धा वाचा
Balasaheb Thorat : ‘भाजपच्या असंतुष्टांना सत्तेची लालसा, म्हणून धडपड’
Politics : सरकारला अस्थिर करण्याचा भाजपसह राज्यपालांचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण