टीम लय भारी
मुंबई: भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. मुंबई बँकेच्या अमर्याद सत्तेच्या केलेल्या दुर्लक्षाकडे महाविकास आघाडीच्या शासनाने दुर्लक्ष करावे, असंख्या घोटाळे करण्याचे दरेकरांचे स्वातंत्र्य अबाधीत ठेवावे. कारण ते नरेंद्र मोदींच्या भाजपाचे नेते आहेत असं त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एक पत्र जाहिर करुन भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे.
कायद्याच्या चौकटीत मा. न्यायालयाच्या आदेशानुसार आमदार प्रविण दरेकर यांच्या विरुध्द दखलपात्र गुन्हा दाखल होताच देवेंद्र फडणवीसांचा नुसता जळफाट झाला. भाजपाच्या नेता हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. असा गोड समज देवेंद्र फडणवीसांनी करुन घेतला आहे. शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून रोज उठून “या नेत्याला अटक होणार! त्या नेत्याचे दिवस भरले ” कुठलाही घोटाळा, न झाला तरी शंभर कोटीचा आकडा पक्का, भाजपा सरकारच्या हुकूमावरुन ई.डी.चे इन्कम टॅक्सचे व सि.बी.आय.चे अधिकारी बरोबर सांगितलेल्या दिवशी धडाधड कार्यवाही करीत आहेत. जणू काही त्यांना आपल्या मालकाला केलेल्या कामाचा लेखाजोखाच द्यायचा आहे, असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राकेश कुमार वाधवान व ई.डि.चे दुसरे आरोपी इक्बाल मिर्ची यांचेकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सन २०१४-१५ मध्ये तसेच २०१७-१८ मध्ये प्रत्येक वेळी दहा कोटी रुपये देणगी की प्रोटेक्शन मणी (खंडणी) घेतल्याचे केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दर्शविण्यात आले आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना फडणवीसाने अत्यंत हास्यास्पद व शाळेकरी मुलाला शोभेल असा बालिश खुलासा केला आहे. २० कोटी रुपये घेतल्याची कबूली देताना आम्ही विकासाकडून देणगी घेतली असे विश्वसनिय वक्तव्य करुन आपले पाप झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आर. के. वाधवान हा साधा विकासक नाही. तर इक्बाल मिर्चीचा भागीदार आहे. एवढेच नव्हे तर, पंजाब महाराष्ट्र बँकेचे साडेतीन हजार कोटी रुपये बुडविण्याच्या भानगडीत आरोपी आहे आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे त्यांचे लाभार्थी आहे. यासंबंधी आपण सक्त वसूली संचलनालय, ई.डी. व गुन्हा मुंबईत घडला असल्यामुळे पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांच्याकडे कायदेशिर तक्रार केली आहे.
एवढ्या गंभीर गुन्ह्याची यापूर्वी ई.डी.ने दखल घेतली, तेव्हा भाजपाला यात कुठलीही सूडबुध्दी फडणवीसांना आठवून आली नाही. पण खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन मुंबई बँकेत घोटाळा करणाऱ्या भाजपाच्या दरेकराविरुध्द नुसत्या गुन्ह्याची नोंद होताच त्यांनी आदळ आपट, थयथयाट व आरडा ओरडा सुरु केला आहे. आम्ही मा. उच्च न्यायालयात जावू, अशा धमक्या देत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नुसत्या मा. उच्च न्यायालयातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जायला हवे. जास्त सखोल तपास करुन घ्यायचा असेल तर सी. बी. आय. कशासाठी? आंतरराष्ट्रीय तपास एजंसी, इन्टरपोलकडेही जाण्याचे त्याचे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेत नाही. महाराष्ट्र विकास आघाडी असल्या पोकळ आणि पादर-फुसक्या धमक्यांना भिक घालत नाही. असे खरमरीत पत्र अनिल गोटे यांनी लिहिले आहे.