आजकाल क्रिकेटमध्ये दररोज नवनविन विक्रम होताना पाहयला मिळत असतात. असाच एक नवा विक्रम रचत गेल्या दोन दिवसांत चर्चेत आलेला धमाकेदार फलंदाज म्हणजे ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाडने सध्या सुरू असलेल्या रणजी चषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध एका षटकांत 7 षटकार ठोकत विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिवाय त्याने या सामन्यांत द्विशतक ठोकत महाराष्टर संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर एका वृत्तवाहिनीने ऋतुराज गायकवाडच्या आई-वडिलांसोबत विशेष संवाद साधत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी आई-वडिलांनी ऋतुराजचे तोंडभरून कौतुक केले.
ऋतुराजने केलेल्या नव्या विक्रमाबाबत मनापासून कौतुक वाटते, तो यापुढेदेखील अशीच कामगिरी करचत राहिल असा विश्वास देखील ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड यांनी व्यक्त केला. सोबतंच ऋतुराज 3 वर्षांचा असताना त्याच्या वाढदिवसादिवशी त्याला खेळण्यातील बॅट भेट म्हणून दिवली होती. तेव्हापासूनच त्याच्या मनात क्रिकेटने राज्य केले त्यानंतर त्याने सरावाला सुरुवात केली आणि तो प्रगती करत राहिला. त्याने मिळवलेल्या यशामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या वयोगटात संधी दिली त्यासाठी आम्ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभारी आहोत अशी भावना देखील यावेळी ऋतुराजच्या वडिलांनी व्यक्त केली. शिवाय लवकरच ऋतुराजला भारताच्या निळ्या जर्सीत ओपनिंग करण्याची संधी मिळेल अशी आशा आणि मिळालेल्या संधीचे ऋतुराजच सोनं करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे सुद्धा वाचा
मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !
ऋतुराजची आई सविता गायकवाड यांनी यावेळी बोलताना ऋतुराजने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. शिवाय ऋतुराजला मिळत असलेल्या प्रेमामुळे आई भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराजच्या आईने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्याने सामना संपल्यानंतर पहिल्यांदा आमच्या सोबत फोनवरून संवाद साधला आणि आम्ही त्याला शुभेच्छा दिल्याची गोष्ट आईने उघड केली.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून ऋतुराज गायकवाडने केलेल्या कामगिरीचे स्रवत्र कौतुक केले जात आहे. अशा स्थितीत आता भारतीय क्रिकेट संघात आगामी 2023 वर्ल्डकपसाठी ओपनर म्हणून स्थान मिळवण्यासाठी असणारी चुरस आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे त्यातील एक स्थान कर्णधार रोहित शर्मासाठी राखीव आहे. त्यामुळे आता दुसरा सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवन, के एल राहुल, शुभमन गिल यांच्या फळीत आता ऋतुराजचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे आता ऋतुराजला टीम इंडियामध्ये संधी कधी मिळणार हे पहावे लागणार आहे.