31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeसंपादकीयCongress NCP : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सत्तेत असताना खीर ओरपली, विरोधात...

Congress NCP : काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सत्तेत असताना खीर ओरपली, विरोधात जाताच म्याव मांजर झाले !

महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्ष नाही की काय असे चित्र आहे. कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress NCP) बहुतांश नेते म्याव मांजर झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात सध्या विरोधी पक्ष नाही की काय असे चित्र आहे. कारण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress NCP) बहुतांश नेते म्याव मांजर झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, हे नेते गेली अडिच वर्षे सत्तेत होते. त्यांनी मंत्रीपदाचा यथेच्छ उपभोग घेतला. हव्या त्या कंत्राटदारांसाठी नवनवीन कामे काढली. बदल्यांमधून मलिदा ओरपला. पण सत्ता जाताच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या बलदंड नेत्यांनी अक्षरशः शेपूट घातल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेकडे नेत्यांची कमतरता आहे. त्यामुळे शिवसेनेची अडचण समजण्यासारखी आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मात्र मूग गिळून गपगार आहेत.

‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. सचिन वाझेचे कांड त्यांनी चव्हाट्यावर आणून देश हादरवून सोडला होता. सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याचे काम ते करीत होते. गरजेपेक्षाही जास्त ते कठोरपणे वागत होते.

हे सुद्धा वाचा

Ambadas Danve: एकनाथ शिंदे राजकारणात गुंग, शेतकरी करताहेत आत्महत्या; अंबादास दानवेंचा घणाघात!

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, सत्ता नसली तरी कामे करणार

VIDEO : अंबादास दानवे म्हणाले, मी हल्ले केले, शस्त्रे वापरली

सध्या अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना सुद्धा सरकारमधील खडानखडा माहिती आहे. रांगड्या भाषेत त्यांनी केलेले आरोप लोकांनाही आवडतात. सत्ताधाऱ्यांवर सर्वसाधारणपणे धारेवर धरण्यापलिकडे ते फार प्रभावी कामगिरी करीत नाहीत. तशीच स्थिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आहे. ते सुद्धा सर्वसाधारण आरोप करतात. वास्तविक देवेंद्र फडणवीस हे स्वतःला स्वच्छ चारित्र्याचे व बिल्कूल भ्रष्टाचार करीत नसल्याचे भासवत असतात.

एकनाथ शिंदे हे सुद्धा हिंदुत्वाचा कैवारी असल्याचे भासवतात. या दोन्हीही नेत्यांचे मोठाले घोटाळे काढून खरा चेहरा जनतेसमोर आणणे सोपे आहे. तसे अनेक घोटाळे शिंदे – फडणवीस यांनी करून ठेवलेले आहेत. परंतु अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले ही मंडळी निव्वळ मोघम आरोप करीत असतात.

भाजप विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ ही मंडळी सरकारवर तुटून पडायची.

काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये अशी मजबूत फळी दिसत नाही. हसन मुश्रीफ, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, दिलीप वळसे – पाटील हे महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर मंत्री होते. सत्ता जाताच हे मंत्री गायब झाल्याचे दिसत आहे. भाजपच्या विरोधात अवाक्षरही निघाले नाही पाहीजे याची अत्यंत खबरदारी ते घेत असल्याचे दिसत आहे.

काँग्रेसची सुद्धा तशीच अवस्था आहे. अशोक चव्हाण, सुनील केदार, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, अमित देशमुख, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी हे नेते सरकारविरोधात ब्र शब्द सुद्धा काढताना दिसत नाहीत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या कारवाईची नको तेवढी भिती या नेत्यांनी बाळगल्याचे दिसत आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मंडळींचे मीडिया मॅनेजमेंट सुद्धा अत्यंत ढिसाळ व बेजबाबदार आहे. या उलट भाजपचे मीडिया मॅनेजमेंट प्रचंड प्रभावी आहे. सध्या डिजिटल मीडियाचे युग आहे. या डिजिटल मीडियापर्यंत प्रभावीपणे व वेळेत बातम्या पोचविण्याची काळजी भाजपचे नेते घेतात.

मुख्य प्रवाहातील बहुतांश वृत्तवाहिन्या या भाजपच्या गुलाम असल्यासारख्याच आहेत. या वृत्तवाहिन्यांमध्ये पेरलेले मालक, संपादक व पत्रकार यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांचा अचूक समन्वय आहे. या वाहिन्या भाजपव्यतिरिक्तच्या इतर पक्षांना फार महत्व देत नाहीत.

भाजपचे प्रत्येक नेते ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचतात. मीडियाकडे प्रसिद्धीपत्रके, व्हिडीओ पाठविण्याची भाजपकडे एक खिडकी पद्धत आहे. तिथून प्रेस नोट, व्हिडीओ छोट्या छोट्या मीडियापर्यंत सुद्धा पोचवला जातो. शिवाय प्रत्येक नेता आपल्या प्रसिद्धीप्रमुखामार्फतही अशी माहिती मीडियापर्यंत पाठवत असतोच.

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे अशी एक खिडकी पद्धतच नाही. काँग्रेस – राष्ट्रवादीचे प्रसिद्धीप्रमुख व प्रवक्ते स्वतःलाच राहूल गांधी व शरद पवार समजतात. पत्रकारांनी बातम्यांच्या अनुषंगाने संपर्क केला तरी मिजाशीच्या भाषेत बोलत असतात. अगदी पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकारांनाही ते माहिती, बातम्या द्यायला टाळाटाळ करतात.

भाजपचे गुलाम असलेला व काँग्रेस – राष्ट्रवादीला हुंगत नसलेल्या मीडियाकडे ही नेते मंडळी प्रसिद्धीसाठी केविलवाणी याचना करीत असतात. पुरोगामी विचारांच्या पत्रकार, मीडियाकडे दुर्लक्ष करायचे, आणि भाजपप्रणीत मीडियाकडे प्रसिद्धीसाठी याचना करायच्या अशी पद्धत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या प्रवक्ते व प्रसिद्धीप्रमुखांनी ठेवली आहे.

सत्तेत असताना याच काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःच्या भोवती भाजपधार्जिण्या प्रसारमाध्यमांना सतत जवळ ठेवले होते.

एकेकाळी काँग्रेस – राष्ट्रवादीकडे सचिन सावंत, नवाब मलिक यांच्यासारखे प्रभावी प्रवक्ते होते. आता या पक्षांमध्ये कोण प्रवक्ते आहेत, हे सुद्धा आठवत नाही इतकी दयनीय स्थिती आहे. सत्ताधारी भाजपवर आसूड ओढायचे नाहीत, आणि मीडिया मॅनेजमेंट सुद्धा अचूक ठेवायचे नाही, असा दळभद्री कारभार काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे.

महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे विचारवंत, पत्रकार, साहित्यिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. ही मंडळी भाजपविरोधात सतत आवाज उठवत असते. जनतेत असलेल्या पुरोगामी विचारांच्या लोकांमुळे राजकारणात होत असलेला आयता फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते उचलत असतात. पुरोगामी विचारवंतांनी भाजपच्या विरोधात रान पेटवावे, त्यानंतर मिळणारे फायदे मात्र आम्ही घेत राहू अशा संधीसाधूंच्या भूमिकेत सध्याचे बहुतांश काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते आहेत, असेच चित्र दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी