32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयउद्धव ठाकरेंनी भाषणाच्या आडून भाजपची काढली खरडपट्टी

उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या आडून भाजपची काढली खरडपट्टी

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

मुंबई : मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी नेहमीच अहंकारी आहे हे सांगत असतानाच कोणताही विकास हा कमी कालावधीसाठी असू नये तर तो दूरगामी परिणाम करणारा असावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज ठासून सांगितले. सवंग लोकप्रियतेसाठी नारळ फोडून भूमिपूजन करणारे हे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसण्यास लायक नसतात असा जोरदार चिमटा ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता काढला. हा चिमटा काढत असतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर आपलीच सत्ता कायम ठेवण्याचा आत्मविश्वास ठाकरे यांच्या भाषणात जाणवत होता.

आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण हे राज्यातील जनतेला भावनिक आवाहन करणारे असे होते. कांजूर मार्ग येथील मेट्रो कारशेड च्या जागेवरून सूर असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी थेट जनतेलाच याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले. आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड जागेवर केवळ एकाच लाईन मधील मेट्रो कोचचे शेड होणार होते. आणि तेथील पर्यावरणाचा -हास सुद्धा होणार होता. अन्य लाईन वरील मेट्रो कोचच्या शेड साठी मग भविष्यात आरे मधील आणखी जागा संपादित करावी लागली असती. त्यामुळे आणखी झाडे भविष्यात तोडावी लागली असती. पण कांजूर मार्ग येथील जागेत मेट्रो 3, ४, 6, 7आणि 14 या मार्गावर असणा-या कोचचे शेड एकाच ठिकाणी होऊ शकते. मेट्रो 14 ही अंबरनाथ बदलापूर पर्यन्त विस्तारित आहे. त्यामुळे तेथील जनतेला कांजूर येथे येऊन मग मुंबई च्या कोणत्याही भागात मेट्रो च्या दुस-या लाईन ने जाता येईल, हे स्पष्ट करताना ठाकरे यांनी जनतेने ठरवावे काय हवे आहे असे सांगून त्यांनी हा वाद जनतेच्या कोर्टात अलगद ढकलला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाची किनार घेऊन उद्धव ठाकरे यांनी प्रसंगी बिकेसी येथील बुलेट ट्रेन साठी दिलेली जागा आपण परत घेऊ शकतो असा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. श्रेयवादासाठी जर कोणी उगाचच अडवणूक करत असेल तर मी तुम्हाला सर्व श्रेय देतो पण जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी समोर या असे सांगून ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आखलेल्या श्रेयाच्या रणनितीला चाप दिल्याचे मानले जाते.

पावसाळ्यात मुंबई ची तुंबई होते. पण या शहराची भोगोलिक रचना ही त्याला कारणीभूत असल्याचे सांगतानाच केंद्र सरकार पंपिंग स्टेशन साठी पर्याप्त जागा माहुल येथे देत नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसल्याने पाणी सखोल भागात तुंबते असे ठाकरे यांनी सांगितले. हे सांगताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा हा मुद्दा उचलणार हे पाहून त्यामधील हवा आधीच काढून घेण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. कलानगर बांद्रा येथील स्कायवॉक हा अनावश्यक ठरला हे सांगून ठाकरे यांनी फडणवीस यांच्या काळात सरसकट बांधण्यात आलेल्या अशा स्कायवॉक वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अंबरनाथ येथील शिव मंदिर परिसर आता आकर्षक झाला आहे या मुद्यावर विशेष भर देताना आपली हिंदुत्ववादी भूमिका अजून तेवढीच कणखर असल्याचा संदेश त्यांनी भाजपला दिला.

आपल्या 35 मिनिटाच्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यानो कोरोना आणि त्याचे संकट यावर फक्त 5 ते 10 मिनिटं भाष्य करताना उर्वरित सर्व भाषणात जनतेला भावनिक आवाहन करतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि पक्ष प्रमुख तसेच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत कट्टर विरोधकांना शाल जोडीतून प्रहार करताना प्रसंगी भावनिक साद घालून आपली प्रतिमा ही एक परिपूर्ण आणि संयमी नेता असल्याचे चित्र जनतेसमोर ठेवण्यात ठाकरे यशस्वी झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी