मराठी मनोरंजन क्षेत्रातील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे आज (ता. ९ ऑगस्ट) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. प्रदीप पटवर्धन यांना रंगभूमीवरील ‘मोरुची मावशी’ या नाटकाने एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. मोरुची मावशी या नाटकामध्ये त्यांनी ‘भैय्या’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या वेगळ्या उंचीवर जाऊन बसले. मोरुची मावशी या नाटकाने दीड हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग हाऊसफुल्ल ठरले.
प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन काळापासूनच एकांकिकेत काम करण्यास सुरुवात केली. प्रदीप पटवर्धन यांची आई उषा नाईक यांनी सुद्धा आपल्या अभिनयाने रंगभूमी गाजवली होती. पण नाटकांमधून फारसा पैसा मिळत नाही, रंगभूमी हे अस्थिर क्षेत्र आहे, याची भीती प्रदीप पटवर्धन यांच्या आईला कायमच असायची.
हे सुद्धा वाचा
Pradeep Patwardhan passed away : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड
प्रदीप पटवर्धन हे गिरगावमध्ये राहायला होते. त्यांनी आर्यन हायस्कुल या गिरगावमध्ये असलेल्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. प्रदीप पटवर्धन यांच्या आई उषा पटवर्धन या स्वतः रंगभूमीवरील कलाकार असल्याने प्रदीप यांना लहानपणापासूनच अभिनयाची देणगी मिळाली होती. प्रदीप पटवर्धन हे सिद्धार्थ महाविद्यालयात असताना त्यांनी महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि अभिनयाचे प्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केले.
प्रदीप पटवर्धन हे रंगभूमीवर गाजत असतानाच त्यांनी आर्थिक बाजू भक्कम करणारी नोकरी करावी, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. म्हणूनच प्रदीप त्यांना मिळेल ते काम करून पैसे कमवायचे. अशाच वेळी त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेत नोकरी मिळाली. रिझर्व्ह बँक इंडियामध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी नाटकाच्या अंतर बँक स्पर्धेत भाग घेतला आणि पुरस्कार सुद्धा पटकावला. पण प्रदीप पटवर्धन यांचे नशीब म्हणावे की काय पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच प्रदीप यांना बँकेची नोकरी गमवावी लागली.
प्रदीप पटवर्धन यांनी नाटकाच्या अंतर बँक स्पर्धेत पुरस्कार पटकाविल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी कामावर गेले. पण याचवेळी त्यांना बँकेच्या मॅनेजरने हातात नारळ दिला आणि कामावरून काढून टाकले. हा किस्सा स्वतः प्रदीप पटवर्धन यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता. परंतु नोकरी जाऊन सुद्धा प्रदीप हे नाटकामध्येच काम करत राहिले.
नाटकात काम करत असताना एक दिवस प्रदीप पटवर्धन अभिनेते अमोल पालेकर यांच्या नजरेत आले. यानंतर अभिनेते अमोल पालेकर यांनी प्रदीप यांची विचारपूस केली आणि अमोल पालेकर यांच्या मदतीनेच ते पुन्हा एकदा बँक ऑफ इंडियामध्ये कामावर रुजू झाले. यावेळी मात्र नाटकात काम करण्याने नाराज असलेल्या प्रदीप यांच्या आई उषा पटवर्धन यांनी तू कामासोबत नाटकातही काम कर, असा आत्मविश्वास दिला.