28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र'स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?'

‘स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ''जे स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?'' अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावरुन राज्यात वातावरण तापले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये असा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करत महाराष्ट्राच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या हबलतेवर टीका केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”जे स्वत:साठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?” अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरुन सध्या दोन्ही राज्यांमध्ये संबंध ताणले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कुरघोड्या करत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सीमाभागातील गावांवर देखील त्यांनी दावा सांगितला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जत तालुक्यातील गावांना कर्नाटकचे पाणी देखील सोडले. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असे देखील बोम्मई म्हणाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी संवाद साधण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई जाणार होते. मात्र हा दौरा रद्द झाला. त्यातच आज बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकच्या या कुरघोडीनंतर शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ” एका बाजूला शेतकरी त्रस्त आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. उद्योग महाराष्ट्रातून एका राज्यात पाठवलेत. आता आपल्या महाराष्ट्राची गावं दुसऱ्या राज्यात पळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का?कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या दमदाटीला घाबरून महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारचे मंत्री तंतरले आणि दौरा स्थगीत करून बसले. ही अखंड महाराष्ट्रासाठी शरमेची, दुःखाची गोष्ट आहे. महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे! स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत? राग ह्या गोष्टीचा येतो की, खरंतर जो विषय चर्चेचा नाही त्यावर चर्चा करायला निघाले होते, पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री घाबरून तिथे गेलेच नाहीत. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं!”
हे सुद्धा वाचा
राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

जुळ्या बहिणींचा दादला बनलेल्या टॅक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या प्रयोगाने महाविकास आघाडीत तिढा !

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता बोचरे बाण सोडले आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार घाबरले, ही महाराष्ट्रधर्माशी केलेली गद्दारी आहे. एवढं हतबल सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हतं असे देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते आधी गुजरात, मग आसाम आणि गोव्यात गेले. आदित्य ठाकरे यांनी हाच धागा पकडत नाव न घेता शिंदे गटावर प्रहार केला आहे. ”स्वतःसाठी दुसऱ्या राज्यात पळून गेले, पण महाराष्ट्रासाठी बेळगावला जात नाहीत?” घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र ह्या सगळ्यावर गप्प का? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी