33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईराज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

राज ठाकरेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विशेष पोस्ट करून वाहिली आदरांजली

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर उसळला आहे. अनेक माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला आहे.

6 डिसेंबर 1956 रोजी कायदेतज्ञ तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची प्राणज्योत मावळली. त्यानंतर या दिवशी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून आंबेडकरांना आदरांजली वाहिली जाते. अनेक राजकीय नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन करतात तसेच काही चैत्यभूमी येथे जाऊन आदरांजली वाहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे याबाबतची विशेष पोस्ट राज ठाकरे यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायला हवेत असे राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरला केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफझल खानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं छाटणं, आग्र्याहून सुटका, सुरत स्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार, कृषी धोरण, राज्य कोष, वास्तू रचना, राज्य व्यवस्था, न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्य सांगता येतात.’ असे लिहीत त्यांनी या विशेष पोस्टला सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे की, ‘तसंच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वालाही अनेक पदर आहेत. बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला हे त्यांचं मोठं कार्य आहेच तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अत्युच्च बिंदू पण त्याव्यतिरिक्तही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवेत.’

‘बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते. त्यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मांडलेल्या ‘दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी’ ह्या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बालविवाह, बहुपत्नीत्व ह्यामुळे ‘स्त्री’ स्वत्व गमावून बसली होती. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी प्रयत्न केले पण तेव्हा त्यांना विरोध झाला. अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला, वडिलांच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला, विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळालं.. त्याचवेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असते. असो. बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळंतपणाची भरपगारी रजा, नारायण लोखंडे ह्यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी, कामाचे १२ वरून ८ तास, कामगार संघटनांना मान्यता, आरोग्य विमा, संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कांसाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून घेतली. इतकंच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्भुत होतं आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होतं. माझ्या आजोबांच्या आवाहनानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तिवर्धक ठरली.’ असे लिहीत राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना या पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या प्रयोगाने महाविकास आघाडीत तिढा !

शरद पवार मैदानात उतरले; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सज्जड इशारा

या पोस्टच्या शेवटी राज ठाकरे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर निष्णात कायदेतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले द्रष्टे राष्ट्रीय नेते होते. अशा ह्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम !’ म्हणत आदरांजली वाहिली आहे. राज ठाकरे यांनी ही पोस्ट केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर देखील केली आहे. सध्या राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनीदापोली येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी