तृतीयपंथियांना समाजाला मुख्यप्रवाहात स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगता यावे यासाठी गेले अनेक वर्षे तृथीयपंथियांच्या संघटना लढा देत आहेत. नोकऱ्या, शिक्षण, राजकीय क्षेत्रात आरक्षण तसेच लघु उद्योगातून अर्थार्जन व्हावे यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत. त्याच अनुशंगाने तृतीयपंथींसाठी कल्याणकारी बोर्डाची स्थापना राज्य सरकारने करावी ही देखील या संघटनांची प्रमुख मागणी आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज तृतीयपंथियांच्या समस्या जाणून घेत, त्या सोडविण्याची ग्वाही दिली.
मंगळवारी (दि.२३) रोजी अंबादास दानवे यांच्या दालनात समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर अध्यक्ष व सारथी फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. डॉ. पंकज यादव, गुरू शोभा नायकजी, एम निषाद, सना, वासवी त्रिवेणी समाज, अमृता, रेणुका, शिल्पा आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये तृतीयपंथींसाठी कल्याणकारी बोर्डाची स्थापना लवकरात लवकर करावी अशी मागणी तृतीयपंथियांच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. यावेळी दानवे यांनी तृतीयपंथीय समाज घटकांच्या मागण्या तसेच समस्या, प्रश्न सविस्तर जाणून घेतले. तसेच या घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपूरावा करण्याचे देखील आश्वासन दिले.
हे सुद्धा वाचा
मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेमध्ये जुंपली
चंद्रावर उतरण्यास चांद्रयान सज्ज; अवघे काही तास बाकी
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात तृतीयपंथिय समाज पिढ्यानपिढ्या शोषित, वंचित अवस्थेत आहे. या घटकाला समाजात योग्य स्थान मिळावे, त्यांना संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक संघटना प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमिवर आज दानवे यांनी या समाज घटकाच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या. तृतीयपंथियांचे सामाजिक स्थान, जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करणार असल्याची देखील दानवे यांनी ग्वाही दिली.